भाजपा खासदार निशिकांत दुबे हे पक्षाचे असे नेते आहेत, ज्यांचा वापर भाजपाचे नेतृत्व लाऊड स्पीकर सारखा करीत असते. संसदेत जेव्हा जेव्हा गांधी परीवाराबाबत किंवा अन्य एखाद्या संवेदनशील विषयावर बोलायचे असते तेव्हा दुबे यांना बोलण्याची संधी दिली जाते. दुबे बोलायला उभे राहतात आणि अत्यंत कठोर शब्दात प्रहार करतात. त्यांनी सुतोवाच केले आहे की, ‘भारतात निकाह करून आलेल्या पाच लाख पाकिस्तानी महिला आहेत, ज्यांच्याकडे नागरीकत्व नाही.’ हे विधान म्हणजे मोदी सरकारने स्वच्छ भारत अभियानाचा दुसरा टप्पा सुरू केल्याचे हे संकेत आहेत. अल्पसंख्य मतांसाठी लाळ गाळणारे नेते या स्वच्छता अभियानातील सगळ्यात मोठा अडसर बनण्याची शक्यता आहे.