काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे कधी काळी ब्रिटीश नागरीकत्व होते, असा दावा एकेकाळी भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता. याच आधारावर त्यांची खासदारकी रद्द करावी अशी मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ब्रिटिश नागरिकत्वाचा दावा करणारी एक याचिका फेटाळून लावली आहे. याचिकाकर्ते पुरावा सादर करू शकले नाहीत, असे न्यायालयाने म्हटले आहे. या निकालानंतर काँग्रेसचे नेते जल्लोष करीत आहेत. राहुल गांधी यांची प्रतिमा मलिन करण्याचा भाजपाचा प्रयत्न उधळला गेला, असा दावा करीत आहेत. प्रत्यक्षात झाले काय, याबाबत जनतेच्या मनात प्रचंड गोंधळ उडाला आहे. न्यायालयाच्या निकालानंतर काँग्रेसचे नेते-प्रवक्ते जनतेच्या समोर आले. राहुल गांधी यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी भाजपाचे लोक हे असे उपद्व्याप करीत असून न्यायालयाच्या निकालामुळे त्यांना चपराक मिळाली आहे, असा दावा काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी केला. राहुल गांधी यांच्या विरोधात जे बोलले जाते, त्या गोष्टी हवाहवाई नाहीत. ते ब्रिटनमध्ये होते. तिथे त्यांनी एका कंपनीची स्थापना केली. त्या कंपनीच्या २००५ आणि २००६ च्या इनकम टॅक्स रिटर्नमध्ये स्वत:ची नोंद ब्रिटीश नागरीक म्हणून केली, हे आरोप भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी केले होते. घटनेचे आर्टीकल ९ आणि १८ अंतर्गत दुसऱ्या देशाचे नागरीकत्व घेतल्यानंतर भारतीय नागरीकत्व आपोआप रद्द होते. काँग्रेसवाले कागदपत्रांमध्ये ब्रिटीश म्हणून नोंद असल्याचे मान्य करतात. परंतु ही नोंद म्हणजे निव्वळ टायपो एरर होती, असा त्यांचा दावा आहे.



