केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची काल पत्रकार परीषद झाली. पहेलगाम हल्ल्यानंतर देशात ज्या प्रकारचे वातावरण निर्माण झाले आहे ते पाहाता, ते याच संदर्भात काही बोलतील, एखादी महत्वपूर्ण घोषणा करतील अशी अपेक्षा होती. कारण पाकिस्तानचा आचरट रेल्वे मंत्री मोहम्मद हनीफ अब्बासी याने आमच्याकडे असलेली अण्वस्त्र चौकात शोभेसाठी ठेवण्या करीता नाहीत, असे विधान केले होते. त्यामुळे त्यांच्या रेल मंत्र्याला आमचे रेल मंत्री उत्तर देणार असा काही प्रकार, असण्याची शक्यता वाटत होती. परंतु सुदैवाने भारताकडून अशा अपरीपक्वपणाचे दर्शन झाले नाही. वैष्णव यांनी केवळ मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या जातीगत जनगणनेच्या निर्णयाची माहिती दिली. या पत्रकार परीषदेच्या काही तास आधी पहाटे २ वाजता पाकिस्तानचा माहिती प्रसारण मंत्री अताउल्लाह तरार याने एक पत्रकार परीषद घेतली होती. या दोन पत्रकार परीषदांची तऱ्हा वेगळी असली तरी त्यांची तुलना होणे अपरीहार्य होते.