भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नीतीन नबिन यांनी सोमवारी त्यांची नवी टीम जाहीर केली. भाजपाच्या राष्ट्राध्यक्ष पदी नियुक्ती झाल्यानंतर टीम घोषित करण्यासाठी त्यांनी ७ महिन्यांपेक्षा जास्त काळ घेतला. २०२७ मध्ये सात राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. ज्यात उत्तर प्रदेशचाही समावेश आहे. याला लोकसभेची सेमी फायनल मानले जाते. २०२९ मध्ये लोकसभांची निवडणूक आहे. भाजपाच्या नव्या टीममध्ये अशी दोन प्रमुख नावे आहेत, जी पाहील्यावर राजकारणाला सापशिडीचा खेळ का म्हणतात, याचा प्रत्यय येतो. विनोद तावडे आणि स्मृती इराणी हे दोन्ही नेते ऐनभरात असताना गाळात गेले, पुन्हा एकदा त्यांनी उसळी मारली आणि वर आले. दोघांवर नव्या टीममध्ये महत्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. हिंदुस्तान की सत्ता का रास्ता उत्तर प्रदेश से जाता है…, धुरंधर सिनेमात सांगितलेले हे भारताच्या राजकारणाचे वास्तव आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये वाराणसीतून लोकसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. भाजपाने नवे राष्ट्रीय पदाधिकारी जाहीर केल्यानंतर उत्तर प्रदेशचा प्रभार सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आलेल्या विनोद तावडेंकडे सोपवला आहे. सृती इराणी यांनाही सरचिटणीस बनवण्यात आले आहे. त्या अमेठीतून खासदार राहीलेल्या आहेत. त्यामुळे त्यांची तोफही उत्तर प्रदेशात धडधडणार हे उघड आहे.



