देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपाखाली आसाममध्ये आणखी तीन जणांना अटक करण्यात आली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सोशल मीडिया पोस्टद्वारे देशविरोधी टिप्पण्या केल्याबद्दल बारपेटा येथील अजीजुर रहमान, होजई येथील जॉयनालुद्दीन आणि चिरांग येथील अशरफुल इस्लाम यांना अटक करण्यात आली आहे. यासह दहशतवादी हल्ल्यानंतर आसाममध्ये देशविरोधी भाष्य केल्याबद्दल अटक करण्यात आलेल्यांची संख्या ४२ वर पोहोचली आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये अटकेची पुष्टी केली. अटक केलेल्या लोकांना देशद्रोही ठरवताना मुख्यमंत्री सरमा म्हणाले, “आमचे आसाम पोलिस भारतात राहून देशाविरुद्ध वक्तव्य करणाऱ्या अशा देशद्रोह्यांना ओळखण्यासाठी आणि त्यांना ताब्यात घेण्यासाठी सतत मोहीम राबवत आहेत. रविवारी (४ मे) बारपेटा पोलिसांनी अजीजुर रहमानला अटक केली, होजई पोलिसांनी जॉयनालुद्दीनला अटक केली आणि चिरंग पोलिसांनी अश्रफुल इस्लामला अटक केली. या मोहिमेत अटक केलेल्यांची संख्या ४२ झाली आहे. जर तुम्हाला अशा देशविरोधी वक्तव्य करणाऱ्या व्यक्ती दिसल्या तर प्रशासनाला कळवा,” असे आवाहनही मुख्यमंत्री सरमा यांनी केले आहे.
देशविरोधी वक्तव्य केल्याच्या आरोपाखाली आसाममध्ये अटक करण्यात आलेल्या ४२ जणांमध्ये एका आमदाराचाही समावेश आहे. धिंग विधानसभा मतदारसंघातील विरोधी पक्ष एआययूडीएफचे आमदार अमिनुल इस्लाम यांना २४ एप्रिल रोजी अटक करण्यात आली. आमदार अमिनुल सध्या नागाव जिल्हा तुरुंगात आहेत.
हे ही वाचा :
भारतातील २२ पाकिस्तानी महिलांना १०० मुले, कुटुंबातील सदस्य ५००च्या घरात
पुतिन यांचा पंतप्रधान मोदींना फोन, काय म्हणाले ?
दरम्यान, गोलपारा जिल्ह्यात निवडणूक प्रचारादरम्यान मुख्यमंत्री सरमा यांनी अलीकडेच म्हटले होते की, भारताचे खावून पाकची स्तुती करणाऱ्यांचे मी कायदेशीररित्या पाय तोडेन, कोणालाही सोडले जाणार नाही. आम्ही त्यांना सहन करणार नाही. आम्हाला जे काही करायचे आहे ते कायद्याच्या कक्षेत राहून करू. जेणेकरून भविष्यात आसाममध्ये राहणाऱ्या कोणालाही ‘पाकिस्तान झिंदाबाद’ म्हणण्यापूर्वी शंभर वेळा विचार करावा लागेल.