राज्यात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावत मराठवाड्यासह अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. याचा सर्वाधिक फटका बळीराजाला बसला असून शेतीचं मोठं नुकसान झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये बचावकार्य सुरू असून पुरात अडकलेल्यांना स्थलांतरित करण्यात येत आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले होते त्याचे पंचनामे करुन मदतीचे आदेश दिले आहेत. ३१ लाख ६४ हजार शेतकऱ्यांना २ हजार कोटींहून अधिक मदत करण्याचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पुढच्या आठ ते दहा दिवसांत पैसे जमा होतील. जशा गोष्टी समोर येत आहेत तशी मदत करणं सुरु आहे. मृत्यू किंवा दुर्दैवी घटना घडल्यास जिल्हाधिकारी स्तरावर मदतीचे आदेश दिले आहेत. पुरामुळे जी घरांची हानी होते त्याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.
पुढे ते म्हणाले की, मंत्रिमंडळाच्या बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला. कुठल्या जिल्ह्यात काय स्थिती आहे ते पाहिलं आहे. पालक मंत्र्यांनाही पूरग्रस्त भागांचा दौरा करण्यास सांगितलं आहे. काही जिल्ह्यांना स्वतः भेट देणार आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होते आहे त्याबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की जी काही नियमांमध्ये आहे ती मदत आम्ही सुरु केलं आहे. केंद्र सरकारचीही मदत घेऊ. पण, तोपर्यंत राज्य सरकार थांबणार नाही.
हेही वाचा..
‘काँग्रेसच्या अहंकारी मानसिकतेचे खळबळजनक वास्तव उघड’
“… अशा भाषेची गरज नाही!” शशी थरूर संतापले!
आयुष्मान भारत योजनेची सात वर्षे पूर्ण
एआय मागणी पूर्ण करण्यासाठी २ ट्रिलियन डॉलर्सच्या उत्पन्नाची गरज
आत्तापर्यंत २२१५ कोटी रुपयांची मदत आम्ही केली आहे. त्यातले १८२९ कोटी रुपये पोहचले आहेत. बाकी रक्कम आठ ते दहा दिवसांत पोहचेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तातडीची मदतही आपण करतो आहे. ज्यांचं स्थलांतर केलं आहे त्यांच्या राहण्याची, जेवणाची सगळी व्यवस्था सरकारने केली आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.







