गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील गोपाळगड किल्ल्याचा एक व्हीडिओ नुकताच व्हायरल झाला. हा किल्ला आपल्या मालकीचा असल्याचे एक मणियार नावाचा व्यक्ती सांगत असल्याचे त्या व्हीडिओत दिसत होते. त्या किल्ल्यावर फिरायला गेलेल्या एका युवकाचा त्या मणियार नावाच्या तरुणाशी वाद झाला. तेव्हा या किल्ल्याची मालकी आपली आहे, असे विधान मणियारने केले. तिथे त्याच्या नावाचा कोणताही फलक नसल्याचे सदर तरुणाने मणियारला विचारले तेव्हा त्याची गरज नाही, तुम्हाला हवे तर आरटीआयच्या माध्यमातून माहिती काढा असे मणियार सांगू लागला.
यानिमित्ताने हा किल्ला नेमका मणियारच्या ताब्यात आहे की महाराष्ट्र सरकारच्या असा प्रश्न विविध स्तरातून विचारला जाऊ लागला आहे. त्यासंदर्भात विधान परिषदेचे भाजपाचे आमदार प्रमोद जठार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करून राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित झाले आहे. मात्र, किल्ल्याची जागा अजूनही खासगी मालकीची असून पुरातत्व विभाग व महसूल विभागाने ही जागा शासनाच्या नावे करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.
पडलेले आंबे उचलले म्हणून सदर तरुणाशी मणियारचा वाद झाला. त्यावरून सगळे नाट्य रंगले. आता गोपाळगडाची खासगी मालकी संपुष्टात आणण्यासाठी शिवप्रेमी पुन्हा एकवटले आहेत. समुद्रमार्गे होणारी आक्रमणे थांबवण्यासाठी तसेच दाभोळ खाडीमार्गे वाशिष्ठीला जाऊन मिळणारा हा जलमार्ग अधिक सुरक्षित व्हावा यासाठी दाभोळ खाडीच्या मुखाजवळ अंजनवेल येथील गोपाळगड किल्ला शिवकालीन इतिहासाची साक्ष देत आहे. अशा या गोपाळगडातील आतील जमिन लिलावाद्वारे विकल्याने किल्ला आहे. मात्र, किल्ल्यातील आतील जागा शासकीय मालकीची नाही, असे म्हटले जात आहे. गोपाळगड किल्ला राज्यसंरक्षित स्मारक म्हणून जाहीर झाला असून गडामध्ये कोणतेही बांधकाम अथवा कोणताही बदल करण्याचा अधिकार खासगी व्यक्तीला नाही. याबाबतही अंतिम निर्णय झाला आहे. गतवर्षी गडाच्या आतील जागेमध्ये करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम पुरातत्व विभागाने कारवाई करत काढून टाकले आहे. मात्र, आतमध्ये असलेल्या आंबा बागायतीमुळे या जागेवर अजूनही खासगी व्यक्तीचाच दरारा असल्याचे पुढे आले आहे.
हे ही वाचा:
संरक्षण सचिव राजेश कुमार बनले डीआरडीओचे अध्यक्ष
२०३५ पर्यंत भारत बनणार सेमीकंडक्टर महासत्ता!
पाकने ट्रम्प यांचा प्रस्ताव फेटाळला? पॅलेस्टाईन, गाझा बाबतीतील भूमिकेवर ठाम!
एका पर्यटकाने किल्ल्याला दिलेल्या भेटीमध्ये गडाच्या आतमध्ये पडलेला आंबा उचलला. आंबा उचलला म्हणून तेथील जागेची मालकी असलेल्या व्यक्तीने या पर्यटकाला रोखले. हा किल्लाच जणू १९६० मध्ये शासनाकडून आम्ही विकत घेतल्याचा त्याने सांगितले. गट क्र. ८२ व २३ ही जागा आपल्या मालकीची असून तुम्ही शासनाकडे माहिती घ्या. मात्र त्या पर्यटकाने हा किल्ला हा राज्य संरक्षित स्मारक असल्याचे व किल्ले कोणाच्याही खासगी मालकीचे नाहीत, असे उत्तर दिले. मात्र जागा मालकाच्या वादामुळे गडाचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.







