चारधाम यात्रेअंतर्गत बाबा केदारनाथकडे जाणाऱ्या सर्व हेलिकॉप्टर सेवा तात्काळ बंद करण्यात आल्या आहेत. पुढील आदेश येईपर्यंत या सर्व हेली सेवा बंद ठेवण्याचा आदेश उत्तराखंड सरकारने जारी केला आहे. सरकारच्या आदेशानुसार, केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री येथे चालणाऱ्या सर्व हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेश येईपर्यंत थांबवण्यात आल्या आहेत.
ही कारवाई अशा वेळी करण्यात आली आहे, जेव्हा भारत-पाकिस्तान सीमारेषेवर तणाव सतत वाढत आहे. पाकिस्तानकडून भारताच्या सीमावर्ती भागांवर सातत्याने हल्ले करण्यात येत आहेत, ज्याला भारतीय लष्कर कडक प्रत्युत्तर देत आहे. या संदर्भात, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली होती.
हेही वाचा..
मातृ-शिशु आरोग्य निर्देशांकांमध्ये सुधारणा
नोरा फतेही काय म्हणाल्या भारतीय लष्कराबद्दल?
पाकिस्तानचे ५० पेक्षा जास्त ड्रोन, क्षेपणास्त्रे केली नष्ट
पाकिस्तानकडून खोट्या बातम्यांचा मारा; हवाई दलाच्या तळाचे बनावट फोटो
सीएम धामी यांनी एक्सवर फोटो शेअर करत लिहिले, “भारत सरकारकडून दहशतवादाविरोधात घेतल्या जात असलेल्या कठोर भूमिकेच्या पार्श्वभूमीवर सचिवालयात एक उच्चस्तरीय बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्येक संभाव्य परिस्थितीला सामोरे जाण्याची पूर्ण तयारी ठेवण्याचे आणि सीमावर्ती भागात विशेष सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच तेथे तैनात असलेल्या प्रशासनिक यंत्रणांना सज्ज ठेवण्याचेही आदेश दिले आहेत.
ते पुढे म्हणाले, “राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये पुरेशा प्रमाणात जीवनरक्षक औषधे, सर्जिकल उपकरणे आणि अन्य आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध असतील याची खात्री करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच अन्न व नागरी पुरवठा विभागाला अन्नधान्य, राशन आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आपत्कालीन स्थितीत त्वरित कारवाई करता यावी म्हणून आपत्ती व्यवस्थापन पथक सज्ज ठेवण्यास सांगितले आहे.”
“याशिवाय अफवांना आळा घालण्यासाठी आणि जनतेपर्यंत योग्य माहिती वेळेवर पोहोचवण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाला सक्रिय राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आमच्यासाठी देवतुल्य जनतेची सुरक्षा सर्वोच्च आहे आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आमची सरकार पूर्णपणे सज्ज आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.