पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवार, ८ मार्च रोजी महिलांचा आदर करणे हे राष्ट्राच्या विकासाच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे यावर भर दिला आणि याच भावनेतून भारताने आता महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाचा मार्ग स्वीकारला आहे, असे वक्तव्य केले. गुजरातच्या नवसारीमध्ये जी-सफल आणि जी-मैत्रीसह (G-SAFAL and G-MAITRI programmes) विविध योजना सुरू केल्यानंतर एका सभेला नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, “मी सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे कारण माझे खाते माता आणि बहिणींच्या आशीर्वादाने भरलेले आहे आणि हे आशीर्वाद वाढतच राहतात. महिलांना नारायणी म्हटले जाते. महिलांचा आदर करणे हे राष्ट्राच्या विकासाच्या दिशेने टाकत असलेले पहिले पाऊल आहे. म्हणूनच, विकसित भारत निर्माण करण्यासाठी आणि देशाच्या विकासाला गती देण्यासाठी, भारताने आता महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाचा मार्ग स्वीकारला आहे. आमचे सरकार महिलांच्या जीवनात त्यांचा आदर आणि सुविधा या दोन्ही गोष्टींना सर्वोच्च प्राधान्य देते.”
आम्ही कोट्यवधी महिलांसाठी शौचालये बांधली आहेत. कोट्यवधी महिलांसाठी बँक खाती उघडून त्यांना बँकिंग व्यवस्थेशी जोडले आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. धुरामुळे होणाऱ्या त्रासांपासून महिलांचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या सरकारने उज्ज्वला सिलिंडर पुरवले होते यावरही पंतप्रधानांनी भर दिला. कामगार महिलांना पूर्वी फक्त १२ आठवड्यांची प्रसूती रजा मिळत होती. आमच्या सरकारने ती वाढवून २६ आठवड्यांपर्यंत केली. आमच्या मुस्लिम बहिणी वर्षानुवर्षे तिहेरी तलाक रद्द करण्याची मागणी करत होत्या. त्याविरुद्ध कायदा करून आमच्या सरकारने लाखो मुस्लिम महिलांचे जीवन उध्वस्त होण्यापासून वाचवले आहे. जेव्हा काश्मीरमध्ये कलम ३७० लागू होते तेव्हा तेथील महिला आणि मुलींना अनेक अधिकारांपासून वंचित ठेवण्यात आले होते. जर त्यांनी राज्याबाहेरील एखाद्याशी लग्न केले तर त्यांना वडिलोपार्जित मालमत्तेचा अधिकार गमवावा लागत होता. कलम ३७० रद्द झाल्यानंतर, जम्मू आणि काश्मीरमधील महिलांना आता सर्व अधिकार मिळाले आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, आज महिला मोठ्या संस्थांमध्ये आणि देशातील प्रत्येक क्षेत्रात सर्वोच्च स्तरावर सहभागी होत आहेत. २०१४ पासून, देशातील महत्त्वाच्या पदांवर महिलांचा सहभाग झपाट्याने वाढला आहे. २०१४ नंतर, केंद्र सरकारमध्ये सर्वाधिक महिला मंत्री नियुक्त करण्यात आल्या आहेत. संसदेत महिलांचे प्रतिनिधित्व देखील लक्षणीयरीत्या वाढले आहे. २०१९ मध्ये पहिल्यांदाच ७८ महिला खासदार निवडून आल्या. यावेळी ७४ महिला खासदार आहेत, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
हे ही वाचा..
धर्मांतर करायला लावणाऱ्यांना फाशी देणार
पुण्यात बीएमडब्लू रस्त्यात उभी करून मद्यधुंद तरुणांचे अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल
पंतप्रधान मोदींचे महिला सशक्तीकरणात अद्भुत कार्य
देशाच्या न्यायव्यवस्थेतही महिलांचा सहभाग वाढला आहे याकडे पंतप्रधान मोदींनी लक्ष वेधले. “जिल्हा न्यायालयांमध्ये महिलांची उपस्थिती ३५ टक्क्यांहून अधिक झाली आहे. अनेक राज्यांमध्ये, दिवाणी न्यायाधीशांच्या भरतीमध्ये, ५० टक्क्यांहून अधिक नवीन नियुक्त्या महिलांच्या झाल्या आहेत. भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा स्टार्ट अप इकोसिस्टम आहे. या स्टार्ट-अपपैकी जवळजवळ अर्ध्या स्टार्ट-अपमध्ये महिला गुंतवणूकदार महत्त्वाची भूमिका बजावत आहेत,” असं नरेंद्र मोदी म्हणाले. “भारत अंतराळ विज्ञानात नवीन उंची गाठत असताना अनेक प्रमुख मोहिमांचे नेतृत्व महिला शास्त्रज्ञांच्या पथकांकडून केले जात आहे. जगात सर्वाधिक महिला वैमानिक भारतात आहेत हे पाहून अभिमान वाटतो,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.