उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे पार पडलेल्या महाकुंभ मेळ्यात विक्रमी संख्येने भाविकांनी हजेरी लावली. अध्यात्मिक मेळ्याची दखल जगभरातून घेण्यात आली. देश- विदेशातील भाविकांनी महाकुंभ मेळ्यात सहभागी होत पवित्र स्नान घेतले. तब्बल ६६ करोडहून अधिक भाविकांनी महाकुंभ मेळ्यात हजेरी लावली. अनेक विक्रमांची नोंद झाली. परदेशी नागरिकांनी लावलेली हजेरीही मोठी होती. पर्यटन विभागाच्या मते, अवघ्या ४५ दिवसांत सुमारे ५५ लाख परदेशी पर्यटकांनी कुंभमेळ्याला भेट दिली. गेल्या वर्षी ही संख्या केवळ ५,००० इतकी होती.
प्रयागराजमध्ये पार पडलेला महाकुंभ अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरला आहे. संगमात स्नान करण्यासाठी ७३ देशांचे राजदूत आणि ११६ देशांचे परदेशी भाविक आले होते. यापैकी बहुतेक नेपाळ, अमेरिका, ब्रिटन, श्रीलंका, कॅनडा आणि बांगलादेशमधून आले होते. यासोबतच, रशिया, जपान, जर्मनी, फ्रान्स, ब्राझील, मलेशिया, न्यूझीलंड, इटली, कॅनडा आणि थायलंडसह १०० हून अधिक देशांमधून लोक आले होते.
परदेशी भाविकांनी केवळ प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्यात सहभागी न होता त्यांनी वाराणसी, अयोध्या, चित्रकूट, मथुरा आणि गोरखपूरलाही भेट दिली. परदेशी लोकांच्या आगमनामुळे तेथील हॉटेल्स, गाईड, वाहतूक, हस्तकला आणि स्थानिक व्यवसायांना मोठा फायदा झाला आहे. केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन म्हणतात की, महाकुंभात आलेल्या कोट्यवधी लोकांच्या खर्चाचा परिणाम चौथ्या तिमाहीच्या जीडीपीमध्ये दिसून येईल. तर, केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन- २ योजनेत प्रयागराजची निवड झाली असून यामुळे पर्यटनाला नवीन चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
प्रादेशिक पर्यटन अधिकारी अपराजिता सिंह यांच्या मते, २०१९ मध्ये १०.३० लाख परदेशी पर्यटक कुंभमेळ्याला आले होते तर एकूण भाविकांची संख्या ही २३,९४,७०,००० होती. यंदा सुमारे ६७ कोटी भाविकांनी संगमात स्नान केले. गेल्या वर्षी एकूण ६५ कोटी पर्यटकांनी राज्यात भेट दिली. यामध्ये २३ लाख परदेशी लोकांचाही समावेश आहे. आग्रा येथे सर्वाधिक १४.६५ लाख पर्यटक आले, तर वाराणसी ३.०९ लाख पर्यटकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. मथुरा येथे १.३६ लाख, कुशीनगर येथे २.५१ लाख, अयोध्या येथे २६,०४८ आणि प्रयागराज येथे ४,७९० परदेशी पर्यटक आले. २०२३ मध्ये उत्तर प्रदेशात आलेल्या परदेशी पर्यटकांची संख्या १६ लाख होती, तर २०२२ मध्ये साडेसहा लाख लोक येथे आले होते.
हेही वाचा..
मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये एफडीआय इक्विटी इनफ्लो १६५ अब्ज डॉलरवर
… म्हणून हसन मुश्रीफ यांनी वाशिमच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोडली
विपश्यनेसाठी जाताना केजारीवालांच्या ताफ्यात दोन-दोन कोटींच्या गाड्या!
यासोबतच महाकुंभाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन महामंडळाने लोकांसाठी आधुनिक निवारा स्थळे विकसित केली होती. तर दुसरीकडे, निवास आणि भोजन क्षेत्रातील नवीन संकल्पना बळकट करून खाजगी सहभागाने टेंट सिटीची उभारणी करण्यात आली होती. पर्यटन महामंडळाने टेंट सिटीमधून १०० कोटी रुपये कमावले. तर खाजगी कंपन्यांना ७३.४५ कोटी रुपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. आकाशातून संगम पाहण्याचीही संधी उपलब्ध करून दिली होती. पवन हंसने यातून ५० लाख रुपयांपेक्षा जास्त कमावले आहेत. पर्यटकांच्या मनोरंजनासाठी पर्यटन विभागाने विविध प्रकारचे साहसी आणि जलक्रीडा देखील आयोजित केले. ५०० कलाकारांना आमंत्रित करून भाविकांचे मनोरंजनही करण्यात आले. यावर कोट्यवधी रुपये खर्च झाले. तर, महाकुंभमेळ्यादरम्यान, मोठ्या संख्येने तरुण, कामगार, कलाकार, स्वयंपाकी, वेटर, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, सुतार, पुजारी इत्यादींना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. त्यांची संख्या सुमारे दोन हजार असल्याचे सांगितले जाते आहे.