27.8 C
Mumbai
Friday, May 3, 2024
घरविशेषमहाराष्ट्राला हे भूषण आहे का?

महाराष्ट्राला हे भूषण आहे का?

महाराष्ट्र भूषण सोहळ्यात काही लोकांना गमवावे लागले प्राण

Google News Follow

Related

महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या निमित्ताने खारघर येथे तब्ब २० ते २२ लाख लोक जमा झाले होते. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात आला. मात्र या आनंददायी सोहळ्याला गालबोट लागले ते त्यातील काही लोक हे उष्माघातामुळे मृत्युमुखी पडले. आतापर्यंत १३ लोक या घटनेत बळी गेले आहेत. त्यामुळे एकाअर्थाने या सोहळ्याला या दुर्घटनेमुळे गालबोट लागले. सरकारने आपल्यापरीने या सगळ्या कार्यक्रमाची योग्य व्यवस्था होईल, कुणालाही कसली उणीव भासणार नाही, याची काळजी घेतली असली पाहिजे. तसा दावा सरकारने केलेला आहे.

सर्वांना पाण्याची, वैद्यकीय सुविधाही पुरविण्यात आली पण शेवटी २० ते २२ लाख लोक येणार म्हटल्यानंतर सरकार तरी किती पुरे पडणार. एप्रिलच्या महिन्यात सूर्य आग ओकतो आहे. तापमान जवळपास ४० डिग्री होते. अशा परिस्थितीत या चारशे एकरच्या मैदानात टळटळीत उन्हात काही तास बसणे निश्चितच आव्हानात्मक होते. त्यात उपस्थितांमध्ये विविध वयोगटातील लोक आहेत. त्यात महिला आहेत, वृद्ध आहेत, मुलेही असतील अशा वेळी कुणालाही उष्माघाताचा किंवा अन्य कसलाही त्रास होऊ शकतो.

या सगळ्या बाबी लक्षात घेता खरोखरच एवढी गर्दी जमविणे आवश्यक होते का हा प्रश्न येतोच. एखाद्या बंदिस्त सभागृहात कार्यक्रम केला गेला असता तर त्यातून कदाचित ही नौबत आलीही नसती. पण श्रीसदस्यांना याचि देही याचि डोळा हा कार्यक्रम पाहायचा असल्यामुळे तेही आपुलकीच्या भावनेने तिथे आले. या सगळ्या जनसागरासाठी पाण्याची, वैद्यकीय सुविधांची उपलब्धता असली तरी कुणाच्या व्याधी, कुणाला असलेले आजार, त्यांचे वय लक्षात घेता अशी घटना घडणेही स्वाभाविक आहे. मात्र एवढ्या मोठ्या संख्येने लोक जमल्यावर त्याचे व्यवस्थापन करणेही सोपे नव्हते. एवढे लोक जमविण्याचे आव्हान सरकारने पेलले खरे पण प्रत्येकवेळेस ते शक्य होईलच असे नाही. त्याची प्रचीती सरकारला आली असेल.

एखादा जरी बळी यात गेला तरी ते गालबोट लावणारेच ठरले असते. आता मात्र १३ जणांना प्राण गमवावे लागले. यातून सरकारने काही धडा घेण्याची गरज आहे. अशा कार्यक्रमांचे आयोजन करताना ते अशा भर दुपारी घ्यावेत का, एवढ्या संख्येने लोकांना गोळा होऊ द्यावे का, त्यांची व्यवस्था जरी केली तरी त्यात कुणालाही कसली बाधा होणार नाही, याची काळजी घेता येईल का, हे सगळे पाहावे लागेल.

हे ही वाचा:

बीबीसीला अतीक अहमदबद्दल सहानुभूती, ठरवले रॉबिनहूड

प्रशासनाने मनमानी करून कार्यक्रम केलेला नाही!

‘रंगकर्मी’ जिंकले; प्रशांत दामलेंच्या पॅनलचे दणदणीत यश

श्रीराम मंदिरासाठी १ कोटी देणारे महंत कनक बिहारी दासजी महाराज यांचे अपघाती निधन

गेल्या आठ नऊ महिन्यांपासून एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस यांचे सरकार काम करते आहे. या सरकारबद्दल लोकांच्या मनात आशा आहेत. या सरकारने धडाडी दाखविलेली आहे. सरकार लोकांमध्ये मिसळून लोकांच्या भावना जाणून घेताना दिसते आहे. अशा परिस्थितीत अशी एखादी चूक किंवा उणीव सरकारच्या सगळ्या कामांवर बोळा फिरविणारी ठरू शकते. आपण सर्वसामान्यांसाठी काम करत असताना त्या प्रत्येक सर्वसामान्य माणसाला कोणतीही तोशीश पडणार नाही, याची काळजी सरकारला घ्यावी लागेल. त्यात झालेली चूक ही प्रजेचे हितकर्ते या अर्थाने स्वीकारावी लागेल. सरकार यातून धडा घेईल आणि येत्या काळात सरकार कुणाचेही असले तरी अशा भव्य कार्यक्रमांचे आयोजन करताना सावध पावले टाकेल अशी अपेक्षा!

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा