भारताचा प्रसिद्ध नेमबाज जसपाल राणा यांनी केवळ स्वतःच्या कारकिर्दीत देशाला असंख्य पदकं मिळवून दिली नाहीत, तर खेळातून निवृत्तीनंतरही ते एक उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून उदयाला आले. मनू भाकरसारखी ऑलिम्पिक पदकविजेती खेळाडू घडवणारे हेच ते गुरू!
२८ जून १९७६ रोजी उत्तराखंडच्या उत्तरकाशी येथे जन्मलेल्या जसपाल राणांनी अवघ्या १२व्या वर्षी राष्ट्रीय स्पर्धेत रौप्य पदक जिंकत आपल्या चमकदार कारकिर्दीची सुरुवात केली. १९८८ मधील ३१व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत त्यांनी पुन्हा एकदा रौप्य पदक पटकावलं.
१९९४ मध्ये इटलीच्या मिलानमध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेत त्यांनी ज्युनियर गटात जागतिक विक्रम नोंदवला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली.
१९९६ अटलांटा ऑलिम्पिकमध्ये त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं. १९९४ आणि २००६ च्या आशियाई स्पर्धांमध्ये मिळून त्यांनी ४ सुवर्ण, २ रौप्य आणि २ कांस्य पदकं मिळवली. राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये १९९४ ते २००६ दरम्यान त्यांनी तब्बल ९ सुवर्णपदकं मिळवली, त्यापैकी २००२ मेलबर्नमध्ये ४ सुवर्ण!
नेमबाजीतील योगदानाबद्दल त्यांना केवळ १८व्या वर्षी अर्जुन पुरस्कार, २१व्या वर्षी पद्मश्री, आणि २०२० मध्ये द्रोणाचार्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
२०१२ पासून ते प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनात मनू भाकरने २०२४ पॅरिस ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर पिस्तूल व १० मीटर मिक्सड डबल्समध्ये कांस्यपदक जिंकले. एका ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं मिळवणारी ती एकमेव भारतीय नेमबाज ठरली!
मनूने आतापर्यंत आशियाई स्पर्धा व चॅम्पियनशिपमध्ये ७ पदकं, तर जागतिक स्पर्धा व विश्वचषकात एकूण २२ पदकं पटकावली आहेत.
