32 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
घरविशेषतौक्तेच्या बार्जचा पालघरमधल्या स्थानिक मच्छिमारांना फटका

तौक्तेच्या बार्जचा पालघरमधल्या स्थानिक मच्छिमारांना फटका

Google News Follow

Related

दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीला तौक्ते वादळाचा फटका बसला होता. त्यातून महाराष्ट्राची किनारपट्टी सावरत आहे. या वादळातच ओएनजीसीचा एक बार्ज- गॅल कन्स्ट्रक्टर- पालघर जिल्ह्यातील माहिम जवळच्या वडराई गावाच्या किनाऱ्या लगत येऊन थांबला. आता वादळाला दोन महिने होऊन गेले असले तरीही हा बार्ज अजूनही समुद्रातून काढण्यात आलेला नाही. यामुळे स्थानिक मच्छिमारांना मोठा त्रास भोगावा लागत आहे. त्याबरोबच विविध संकटांचा सामना देखील करावा लागत आहे. बार्जला समुद्रातून बाहेर काढण्यासंदर्भात स्थानिकांनी सरकारकडे पत्रव्यवहार देखील केला आहे.

तौक्ते चक्रीवादळाने महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर धडक दिली होती. त्यामुळे कोकण किनारपट्टीचे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळेस अलिबागच्या किनाऱ्याजवळ बांधण्यात आलेला ओएनजीसीचा एक बार्ज सुटून उत्तरेकडे वाहत गेला होता. गॅल कन्स्ट्रक्टर नावाचा हा बार्ज मुंबईच्या उत्तरेकडे ११५ किमीवर असलेल्या पालघर जिल्ह्यातील माहिममधील वडराई गावाच्या किनाऱ्याजवळ येऊन धडकला आहे. १८ मे रोजी या बार्जने धडक दिल्यानंतर तेथील मच्छिमार समुदायासाला विविध संकटांचा सामना करावा लागला आहे.

हे ही वाचा:

भास्कर जाधव थोडी लाज बाळगा…

कोल्हापूरावर पुन्हा पुराचं सावट?

गाडी चालवणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी विदर्भाच्या समस्या पाहाव्यात

‘हे’ नवे विधेयक मोदी सरकार आणणार

बार्जने धडक दिल्यानंतर २८ मे पासून या बार्जमधून मोठ्या प्रमाणात डिझेलची गळती होऊ लागली. याबाबत ओएनजीसीने सांगितले की या बार्जवर ७८,००० लिटर ज्वलनशील डिझेल होते, परंतु ते बार्जचे इंधन होते. या बार्जवर कोणत्याही प्रकारचे खनिज तेल त्यावेळेस भरण्यात आले नव्हते. बॉम्बे हायमधून उत्खनन करून काढण्यात येणारे तेल समुद्राखालून घालण्यात आलेल्या पाईपलाईनच्या मार्फत किनाऱ्यावर आणण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. डिझेलची गळती सुरू झाल्यानंतर ॲफकॉन कंपनीने किनाऱ्यावरील आणि समुद्रावर पसरलेले तेल काढण्याची तयारी दर्शवली होती. त्यानुसार या कंपनीने या बार्जवरील तेल काढून घेण्यास सुरूवात केली होती.

या तेलगळतीचा मोठा फटका छोट्या मच्छिमारांना बसला होता. किनाऱ्यावर जमा होणाऱ्या तेलाच्या तवंगामुळे सुमारे महिनाभर या मच्छिमारांना मासे पकडता आले नव्हते. कोलंबी, शिंपले, ऑयस्टर, खेकडे यांसारखे किनाऱ्यावर आढळणाऱ्या विविध माशांच्या प्रजातींवर गुजराण करणाऱ्या या मच्छिमारांचे सुमारे महिनाभरासाठी नुकसान झाले होते. या पाण्यातून पकडल्या गेलेल्या माशांना केरोसिनची चव लागत असल्याची तक्रार देखील केली होती. दिवसाला १०० ते ३०० रुपये कमवून गुजराण करणाऱ्या मच्छिमारांचे नुकसान झाले होते. याबद्दल अनेक स्थानिक आदिवासी महिलांनी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाला (एमपीसीबी) पत्र लिहून देखील कळवले होते. स्थानिकांना मासेमारीसाठी दुरच्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता भासत आहे. त्यासाठी लोकांना अधिक वेळ देखील खर्ची घालावा लागत आहे.

स्थानिकांकडून सातत्याने हा बार्ज काढण्यासाठी मागणी केली जात आहे. परंतु त्याबाबत मोठ्या प्रमाणात उदासिनता स्थानिकांच्या वाट्याला आली आहे. या प्रकरणात स्थानिकांची टोलवाटोलवी करण्यात येत आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना देखील स्थानिकांनी पत्रं लिहीली आहेत, मात्र त्याला वाट्याण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत.

पाण्यात बुडालेला हा बार्ज त्याच ठिकाणी मोडून पडेल असे देखील बोलले जात आहे. स्थानिकांकडून याचा मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात येत आहे. त्याच जागेवर या बार्जची मोडतोड झाल्यास स्थानिक पर्यावरणीय संस्थेवर विपरित परिणाम होईल असे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. वडराई गावानजीकचा किनारा खडकाळ असल्यामुळे कुठलीही टगबोट त्याच्यापर्यंत पोहोचणे देखील शक्य नाही.

समुद्राच्या मधोमध अडकलेला हा बार्ज काढायची नेमकी जबाबदारी कोणाची यावरून देखील टोलवाटोलवी चालू आहे. ॲफकॉनकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार या कंपनीचा मूळ मालक आणि ओएनजीसी या दोघांसमवेत झालेला करार आधीच संपुष्टात आला होता. परंतु सातत्याने कंपनीचे नाव माध्यमांमध्ये आल्यामुळे कंपनीने या संदर्भात शक्य ती कारवाई केली होती. पालघरच्या पोलिसांनी याबाबत तिरूपती व्हेसल्स आणि ॲफकॉन या दोन्ही कंपन्यांना या संदर्भात पत्र लिहीले आहे. या बार्जवर मोठ्या प्रमाणात डिझेल शिल्लक आहे. त्यापैकी काही डिझेल काढून घेण्यात आले. काही डिझेल आणि बॅलास्टमधील पाण्यासोबत मिश्रण तयार झाले आहे. या मिश्रणामुळे किनारपट्टी देखील प्रदुषित होत आहे, ज्याचा फटका स्थानिकांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. ॲफकॉनकडून मात्र सातत्याने ही गळती किनाऱ्यापर्यंत पोहोचली नसल्याचा अजब दावा केला जात आहे.

हे ही वाचा:

मालकाला खूश करण्यासाठी भास्कर जाधवांचं गैरवर्तन

चंद्रकांत पाटलांशी झालेल्या भेटीचं हे आहे ‘राज’!

मुख्यमंत्र्यांची पुन्हा माघार

येडियुरप्पा अखेर पायउतार होणार

हा बार्ज समुद्रात अडकल्यामुळे सर्वोत्तम मत्स्योत्पादन क्षेत्रापाशी जाण्याच्या मार्गावरच आहे. त्यामुळे त्या जागेला वळसा घालून लांबच्या मार्गाने त्या ठिकाणी पोहोचावे लागत आहे. शिवाय सध्याच्या काळात वाढलेल्या डिझेलच्या किंमतीमुळे व्यवसायावर विपरीत परिणाम होत असल्याचे देखील स्थानिकांकडून कळले आहे. त्याबरोबरच हा बार्ज त्या जागेहून हलवण्याची जबाबदारी देखील तिरूपती व्हेसल्स या कंपनीवर असल्याचे सांगतिले जात आहे. परंतु याबाबत त्यांच्याकडून काही उत्तर मिळाले नाही.

या बार्जमुळे वडराई आणि इतर काही स्थानिक भागातील लोकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. शासन आणि प्रशासन दोघांकडूनही या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचे समजत आहे. स्थानिकांना होणारा त्रास हा केवळ पर्यावरणीय नसून त्याचा परिणाम थेट उत्पन्नावर देखील होत आहे, ज्याचा मोठा आर्थिक फटका देखील त्यांना बसत आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे लक्ष देऊन हा बार्ज लवकरत लवकर येथून काढून घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

(२२ जुलै २०२१ रोजी हिंदुस्तान टाईम्स वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या 2 months on, a fishing village continue to bear the brunt of Cyclone Tauktae या लेखाचा भावानुवाद)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा