मुंबईसह जलाशय परिसरात गेल्या २४ तासांत झालेल्या जोरदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. ४ जुलै रोजी सकाळी ६ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार सातही तलावांमध्ये १ लाख ३६ हजार १३७ दशलक्ष लिटर (एमएल) उपयुक्त पाणीसाठा नोंदवला गेला आहे. मान्सूनचा जोर कायम राहिल्यास येत्या काही दिवसांत पाणीसाठ्यात आणखी लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
गेल्या २४ तासांत तलाव परिसरात समाधानकारक पाऊस झाला. तुळशी तलाव परिसरात सर्वाधिक १५० मिमी, विहारमध्ये १२२ मिमी आणि भातसा येथे ७२ मिमी पावसाची नोंद झाली. याशिवाय मोडक सागर (४८ मिमी), मध्य वैतरणा (४६ मिमी), अपर वैतरणा (४० मिमी) आणि तानसा (३४ मिमी) येथेही चांगला पाऊस झाला. भांडुप कॉम्प्लेक्समध्ये एका दिवसात ११२ मिमी, तर हंगामातील एकूण पाऊस १,०१२ मिमी झाला आहे.
सातही तलावांपैकी विहार तलावात ६६.६५ टक्के, तर तुळशी तलावात ४५.७४ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. इतर तलावांमध्येही पावसामुळे पाणीपातळी वाढू लागली असून, मान्सूनचा वेग कायम राहिल्यास एकूण साठ्यात मोठी भर पडण्याची शक्यता आहे.
गेल्या २४ तासांत मुंबईतही पावसाने चांगली हजेरी लावली. पश्चिम उपनगरातील एच वेस्ट वॉर्ड कार्यालयात सर्वाधिक १५०.६ मिमी पाऊस झाला. वांद्रे, सांताक्रूझ, घाटकोपर, चेंबूर, मानखुर्द तसेच दक्षिण मुंबईतील अनेक भागांत १२० ते १४६ मिमी दरम्यान पावसाची नोंद झाली.
हे ही वाचा:
पूर्व युक्रेनमधील कोस्तांतिनोवकावर रशियाचा ताबा
“ही खऱ्या बंधुत्वाची भावना”; व्हेनेझुएलाकडून भारताचे आभार
ग्रूमिंग गँगचा म्होरक्या शब्बीरसाठी ब्रिटनचा पाकिस्तानवर दबाव
‘आमचाच गट खरा’ म्हणत ऋतुव्रत बॅनर्जी यांनी घेतला तृणमूल मुख्यालयाचा ताबा
हवामान विभागाने पुढील काही दिवस मुंबई आणि जलाशय परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे जलाशयांतील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होण्याची अपेक्षा असून, मुंबईच्या पाणीपुरवठ्याबाबत दिलासादायक चित्र निर्माण होण्याची शक्यता आहे.







