युद्धग्रस्त इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुखरूप सुटका करून त्यांना मायदेशात आणण्यासाठी सुरू केलेल्या ‘ऑपरेशन अजय’ मोहिमेंतर्गत १९७ भारतीयांचा तिसरा गट नवी दिल्लीत पोहोचला आहे. केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांनी इस्रायलमधून आलेल्या भारतीय नागरिकांचे विमानतळावर स्वागत केले. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशासाठी सेवा करण्यासाठी समर्पित आहेत. त्यांच्या या समर्पणामुळेच भारतीय नागरिकांची इस्रायलमधून सुरक्षित सुटका केली जात आहे. सर्व आपल्या मायदेशी परतल्यामुळे खूष आहेत,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
‘आम्ही भारत सरकारचे आभार मानतो. इस्रायलमध्ये आम्ही भीतीच्या दाट छायेत राहात होतो. आम्ही भारताच्या ‘ऑपरेशन अजय’ या मोहिमेसाठी आभारी आहोत,’ अशी प्रतिक्रिया इस्रायलमधून परतलेल्या भारतीय नागरिकाने दिली.
तत्पूर्वी ऑपरेशन अजय मोहिमेची माहिती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ‘एक्स’च्या माध्यमातून दिली होती. ‘ऑपरेशन अजयची प्रगती सुरू आहे. १९७भारतीयांचा नवा गट विशेष विमानाने परतत आहे. तेल अविवच्या भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी तेल अविवच्या बेन गुरियन विमानतळावरून दोन विशेष विमाने उड्डाण घेतील.
हे ही वाचा:
बोगस पासपोर्ट प्रकरणी सीबीआयचे ५० ठिकाणी छापे
इतिहास घडणार; छत्तीसगडमध्ये ‘बुलेट’वर ‘बॅलेट’चे यश
जयपूरमधील १०० खासगी लॉकरमध्ये ५०० कोटी आणि ५० किलो सोने
कॅनडात तीन हिंदू मंदिरांची तोडफोड आणि चोरी
पहिले विमान स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी सुमारे पाच वाजून ४० मिनिटांनी उडाले. तर, दुसरे विमान स्थानिक वेळेनुसार, रात्री ११ वाजता उडेल. या विमानात ३३० प्रवासी असू शकतात. हे विमान रविवारपर्यंत पोहोचेल. ही दोन्ही विमाने एअर इंडिया आणि स्पाइसजेटची आहेत,’असे त्यांनी जाहीर केले होते. त्यानंतर शनिवारी रात्री उशिरा २७४ भारतीय नागरिकांना घेऊन विशेष विमान नवी दिल्लीसाठी रवाना झाले. आतापर्यंत एकूण ६४४ भारतीय नागरिक इस्रायलमधून सुखरूप मायदेशी पोहोचले आहेत.