उत्तराखंडची राजधानी डेहराडून येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाच्या तयारीदरम्यान दुर्दैवी दुर्घटना घडली. कार्यक्रमस्थळी उभारण्यात आलेल्या मंडपाचा लोखंडी रॉड (खांब) डोक्यावर पडल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते अमर मेहता (६५) यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कार्यक्रमाच्या तयारीदरम्यान एकच खळबळ उडाली असून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
राहुल गांधी शुक्रवारी डेहराडूनमधील बन्नू स्कूल मैदानावर आयोजित ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी करण्यासाठी अमर मेहता कार्यक्रमस्थळी गेले होते. यावेळी मंडपासाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या संरचनेतील लोखंडी रॉड अचानक त्यांच्या डोक्यावर कोसळली. गंभीर दुखापत झाल्यानंतर त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या कार्यक्रमासाठी सुरुवातीला डेहराडूनच्या परेड ग्राऊंडची निवड करण्यात आली होती. मात्र प्रशासनाने परवानगी मागे घेतल्यानंतर काँग्रेसने कार्यक्रमाचे ठिकाण बदलून बन्नू स्कूल मैदान निश्चित केले. त्यानंतर बुधवारीपासून नव्या ठिकाणी तयारी सुरू होती. या तयारीदरम्यानच हा दुर्दैवी अपघात घडला.
अमर मेहता हे डेहराडूनमधील ब्राह्मणवाला परिसरातील रहिवासी होते आणि अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाशी सक्रियपणे जोडलेले होते. त्यांच्या कुटुंबाचाही काँग्रेसशी संबंध असून त्यांचा मुलगा युवक काँग्रेसमध्ये सक्रिय असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसचे उत्तराखंड प्रदेश उपाध्यक्ष सूर्यकांत धस्माना यांनी या घटनेला दुजोरा दिला. त्यांनी सांगितले की, अमर मेहता मंडपाखाली उभे राहून तयारीची पाहणी करत असताना लोखंडी रॉड त्यांच्या डोक्यावर पडली. गंभीर जखमी झालेल्या मेहता यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु त्यांचा जीव वाचवता आला नाही.
हे ही वाचा:
रोहित शर्मा खरंच निवृत्त होणार? प्रशिक्षकांचे वक्तव्य चर्चेत
भेसळीवर FDAचा राज्यभर धडाका; पारशी डेअरीचा परवाना निलंबित
अमेरिकेत पंजाबमधील गँगस्टर जग्गू भगवानपुरिया टोळीचा सदस्य नितीश कौशल अटकेत
चर्चेचे दरवाजे खुले ठेवून अमेरिकेचे इराणवर हल्ले सुरूच
राहुल गांधी डेहराडूनमध्ये आयोजित ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकार, शिक्षण व्यवस्था, बेरोजगारी, स्पर्धा परीक्षा आणि युवकांसमोरील विविध प्रश्नांवर ते विद्यार्थ्यांची मते जाणून घेणार आहेत. या कार्यक्रमाला राज्यभरातून विद्यार्थी, युवक आणि पालक उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.







