काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची आरजेडी नेते तेजस्वी यादव यांच्यासोबत दिल्लीत झालेल्या भेटीनंतर आणि आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बिहारची राजकीय हवा तापली आहे. याचदरम्यान, भाजप नेते आणि बिहार सरकारमधील मंत्री कृष्णनंदन पासवान यांनी काँग्रेस आणि आरजेडीवर जोरदार टीका करताना म्हटले की, “दोघंही युवराज आहेत, आणि दोघंही राजकारणात अजून अपरिपक्व आहेत.
पटण्यात पत्रकारांशी बोलताना मंत्री पासवान म्हणाले, “तेजस्वी यादव कुठेही दौऱ्यावर जावोत, कितीही धावा करत फिरोत, त्यांना काही फायदा होणार नाही. काँग्रेसच्या दरबारात त्यांनी हजेरी लावली, पण काँग्रेसची काय स्थिती आहे, हे देशातील प्रत्येकाला माहिती आहे. राहुल गांधींना राजकारणाची काहीही समज नाही आणि ते अजूनही अपरिपक्व नेते आहेत. तेजस्वी यादवसुद्धा तितकेच अपरिपक्व आहेत. हे दोघं युवराज एनडीएशी लढायला निघालेत?
हेही वाचा..
अमेरिकेतील टेक्सासमध्ये गोवरचा उद्रेक
बंगालमधील मुर्शिदाबाद पु्न्हा पेटले !
ममता बॅनर्जी यांची इमामांशी भेट, काय घडले भेटीत ?
ते पुढे म्हणाले, हे म्हणजे सूर्याला टॉर्च दाखवण्यासारखं आहे. तेजस्वी यादव, राहुल गांधी आणि इतर डाव्या विचारसरणीचे नेते बिहारच्या गावागावांत फिरोत किंवा एकत्र येवोत, एनडीएला हरवू शकणार नाहीत. राजद आणि काँग्रेसमधील वाढत्या अंतर्गत मतभेदांवर बोलताना पासवान म्हणाले की, “हा वाद नवीन नाही. लोकसभा निवडणुकीत काय परिस्थिती होती? आधीच तेजस्वी यादव यांनी राहुल गांधींना एकदा फसवलं आहे. जर राहुल गांधी खरंच चांगले माणूस असतील, तर पुन्हा एकदा त्यांच्यासोबत आघाडी करणार नाहीत. पण जर केलीसुद्धा, तरी एनडीएवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही.
मंगळवारी, बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि लालूप्रसाद यादव यांचे छोटे पुत्र तेजस्वी यादव यांनी दिल्लीत मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. या बैठकीला आरजेडी आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेतेही उपस्थित होते. बैठकीनंतर तेजस्वी यादव म्हणाले, या वेळी एनडीएची सरकार सत्तेत येणार नाही.