पाकिस्तानसोबत सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय नौदलाच्या स्वदेशी विध्वंसक युद्धनौके INS सूरत चे कमांडिंग ऑफिसर (सीओ) कॅप्टन संदीप शोरेय यांनी शत्रूंना ठाम संदेश दिला आहे – “आम्ही सज्ज आहोत”. INS सूरत गुरुवारी गुजरातमधील सूरत शहरात दाखल झाले होते – ज्याच्याच नावावर या युद्धनौकेचे नामकरण झाले आहे. हे जहाज या वर्षी जानेवारीत कमिशन करण्यात आले आणि सूरतकरांना ते पाहता यावे यासाठी एक दिवसासाठी सार्वजनिक दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले होते.
अरब समुद्रात पाकिस्तानच्या जवळ या आधुनिक युद्धनौकेची उपस्थितीच मोठा संदेश देणारी आहे. याप्रसंगी कॅप्टन संदीप शोरेय यांनी सांगितले, “शत्रूंसाठी आणि इतर सर्वांसाठी एकच संदेश आहे – आम्ही सज्ज आहोत. आम्हाला ज्या गोष्टीसाठी सज्ज केलं आहे, त्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत.” अदाणी हजीरा पोर्ट, सूरत येथे INS सूरत पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. भाजपचे राज्यसभा खासदार गोविंदभाई ढोलकिया यांनी जहाजाचे स्वागत करताना सांगितले की, “हे देशाची शान आणि अभिमान आहे. हे नौदलाच्या चार-पाच अद्वितीय युद्धनौकांपैकी एक आहे. हे दाखवते की आम्ही कुठेही असलो तरी सक्षम आहोत. आम्ही चीन-पाकिस्तान यांच्यापासून घाबरत नाही. या ठिकाणावरूनही आम्ही शत्रूंवर क्षेपणास्त्र डागण्यास सक्षम आहोत. पाकिस्तानच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देताना, ढोलकिया म्हणाले, “जे खूप बोलतात, ते काही करत नाहीत. भारत हे करू शकतो आणि सक्षम आहे.”
हेही वाचा..
अशुतोष दीक्षित इंटीग्रेटेड डिफेन्स स्टाफचे नवे प्रमुख
भारतात १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी, कलाकारांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरही बंदी!
पहलगाममधील हल्लेखोर कदाचित दक्षिण काश्मीरमध्ये लपून बसलेत!
सशस्त्र दलांचे मनोबल खच्ची करू नका! सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना खडसावले
सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर जाहीर साजरा करण्याविषयी विचारल्यावर, कॅप्टन शोरेय म्हणाले, “सीमेवरील आव्हाने ही चालूच राहणार – पूर्वीही होती, आजही आहेत आणि पुढेही राहतील. मात्र आजचा दिवस साजरा करण्याचा आहे – त्या गौरवाचा उत्सव ज्यामध्ये भारतीय नौदलाने या जहाजाला सूरतचे नाव देऊन शहराचा सन्मान केला आहे.”
कमांडिंग ऑफिसर यांनी माहिती दिली की, ७,६०० टन वजनाची ही युद्धनौका क्षेपणास्त्र, तोफ प्रणाली, अत्याधुनिक रडार, दोन हेलिकॉप्टर आणि पाणबुडीविरोधी युद्ध उपकरणांनी सुसज्ज आहे. ते म्हणाले, “हे पूर्णपणे भारतात तयार करण्यात आले आहे आणि यामध्ये भारतीय स्टीलचा वापर झाला आहे. ७५ टक्के घटक स्वदेशी आहेत आणि प्रत्येकाच्या हृदयात १०० टक्के भारतीय भावना आहे.”