एका नव्या संशोधनातून असे समोर आले आहे की, निवडक प्रजननाच्या (selective breeding) माध्यमातून प्रवाळांची उष्णता सहन करण्याची क्षमता लक्षणीयरीत्या वाढवता येऊ शकते. हवामान बदलामुळे समुद्राचे तापमान सातत्याने वाढत आहे, ज्यामुळे जगभरातील कोरल रीफ (प्रवाळ भित्ती) धोक्यात आली आहे. अशा स्थितीत हा नवा उपाय प्रवाळांना काही काळासाठी वाचवण्यास उपयुक्त ठरू शकतो. संशोधकांनी ऑस्ट्रेलियाच्या उत्तर-पश्चिम किनाऱ्यावरील जागतिक वारसा स्थळ ‘निंगालू रीफ’ येथे यशस्वीपणे उष्णता सहन करू शकणाऱ्या प्रवाळांचे प्रजनन केले. पश्चिम ऑस्ट्रेलियामधील ‘मिंडेरू फाउंडेशन’ ने दिलेल्या माहितीनुसार, जगभरातील इतर रीफप्रमाणेच निंगालू रीफलाही समुद्री उष्णतेचा आणि ब्लीचिंग (पांढरट होणे) या मोठ्या प्रमाणावर घडणाऱ्या घटनांचा सामना करावा लागत आहे.
मिंडेरू फाउंडेशनच्या टीमने सांगितले की, ज्या प्रवाळांचे पूर्वज किमान एक उष्ण वातावरणातील रीफमधून आले होते, त्यांनी वाढत्या तापमानात स्वतःला चांगल्या प्रकारे जपले. या संस्थेचे सह-संस्थापक आणि ऑस्ट्रेलियन उद्योजक अँड्र्यू फॉरेस्ट यांनी सांगितले की, ही पहिलीच वेळ आहे जेव्हा आपण प्रवाळांचे निवडक प्रजनन करून त्यांची उष्णता सहन करण्याची क्षमता वाढवू शकतो हे यशस्वीपणे दाखवून दिले आहे. हा एक महत्त्वाचा अल्पकालीन उपाय आहे ज्यामुळे प्रवाळ भित्तीचे रक्षण शक्य होऊ शकते.
हेही वाचा..
रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रा. लि. गेली उच्च न्यायालयात
तहव्वुर राणाला कुटुंबाशी फोनवर बोलण्याची मिळाली परवानगी!
ओकिनावामध्ये अमेरिकन एअर बेसजवळ स्फोट
एसबीआयने सरकारला किती हजार कोटींचे लाभांश दिले?
फॉरेस्ट म्हणाले, “जगाने समुद्राचे वाढते तापमान तात्काळ थांबवले पाहिजे, अन्यथा पुढील 50 वर्षांत बहुतेक कोरल रीफ पूर्णपणे नष्ट होण्याची खरी शक्यता आहे.” या टीममध्ये वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ, क्वीन्सलँडमधील जेम्स कुक विद्यापीठ, जर्मनीतील ब्रेमेन विद्यापीठ, आणि अमेरिकेतील टेक्सास ए अँड एम विद्यापीठ यांचे सहकारी सहभागी होते.
सिन्हुआ या बातमी संस्थेच्या माहितीनुसार, या संशोधनाचे निष्कर्ष अशा वेळी समोर आले आहेत जेव्हा २०२३ पासून मोठ्या प्रमाणावर ब्लीचिंगच्या घटना घडल्या, आणि यामुळे जगातील ८४ % रीफ, किमान ८२ देश व प्रदेशांत प्रभावित झाल्या. मार्च २०२५ मध्ये, ऑस्ट्रेलियामधील निंगालू आणि ग्रेट बॅरियर रीफ या दोन्ही रीफनी पहिल्यांदाच एकाच वेळी ब्लीचिंगचा अनुभव घेतला. संशोधकांनी सांगितले की, हे निष्कर्ष प्रवाळ भित्तींचे संरक्षण करण्यासाठी धोरणे आखण्यात फार महत्त्वाचे ठरतील. वाढत्या समुद्री उष्णतेमुळे ही कृती तात्पुरता बचाव पुरवू शकते, जोपर्यंत जग जीवाश्म इंधनाचा वापर बंद करत नाही, कारण तेच हवामान बदलाचे मुख्य कारण आहे.
प्रवाळ भित्ती कोट्यवधी लोकांच्या उपजीविकेसाठी महत्त्वाची असते, तटीय भागांचे संरक्षण करते आणि सागरी जैवविविधतेपैकी एक चतुर्थांश हिस्सा प्रदान करते. मात्र, जागतिक पातळीवर यामध्ये झपाट्याने घट झाली आहे.
