छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये चार दिवसांपूर्वी नक्षलवादी आणि सुरक्षा दल यांच्यात मोठी चकमक झाली होती. या मोहिमेत सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले होते. तब्बल ३१ नक्षलवादी या चकमकीत मारले गेले होते. तर, दोन जवान हुतात्मा झाले आणि दोन जवान जखमी झाले होते. नक्षलविरोधी मोहिमेतील ही मोठी कारवाई होती. यानंतर छत्तीसगड पोलिसांनी दावा केला आहे की, ठार झालेल्या ३१ माओवाद्यांपैकी २८ माओवाद्यांची ओळख पटली आहे. यात अनेक नक्षलवाद्यांवर मोठी बक्षीस रक्कम देखील होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओळख पटलेल्या २८ नक्षलवाद्यांमध्ये १७ पुरुष आणि ११ महिलांचा समावेश आहे. या सर्वांवर एकूण १.१० कोटी रुपयांचे बक्षीस होते. शिवाय ६ जानेवारी रोजी झालेल्या आयईडी स्फोटाचा मास्टरमाइंड देखील या चकमकीत मारला गेला आहे.
बस्तर रेंजचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी म्हणाले की, ठार झालेल्या ३१ नक्षलवाद्यांमध्ये बंदी घातलेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या (माओवादी) पश्चिम बस्तर विभागाचा सचिव हुंगा कर्मा यांचा समावेश आहे. त्याच्यावर ८ लाख रुपयांचे बक्षीस होते. हुंगा कर्मा हा ६ जानेवारी रोजी सुरक्षा कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड होता. तसेच २००६ च्या मुर्किनार कॅम्प हल्ल्यात आणि २००७ च्या राणीबोडली कॅम्प हल्ल्यात त्याचा सहभाग होता. त्याच्याविरुद्ध बिजापूर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये आठ नक्षलवादी- संबंधित गुन्हे दाखल आहेत, ज्यात पोलिस पथके आणि छावण्यांवर हल्ले, अपहरण आणि हत्या अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. पोलिसांनी सांगितले आहे की, ओळख पटलेल्या २८ नक्षलवाद्यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आले आहेत. उर्वरित तीन जणांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
हे ही वाचा :
राजस्थानच्या धोलपूरमध्ये तीन गो तस्करांना अटक, २६ गायींची सुटका!
मुस्लीम नर्स म्हणाली, ‘आम्ही अनेक इस्रायली रुग्णांना मारले, नरकात पाठवले’
“मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा निर्णय देण्यापूर्वी बदलीची टांगती तलवार डोक्यावर होती”
ममता कुलकर्णी यांचा यु- टर्न; किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदावर कायम
केंद्र सरकारच्या पुढाकाराने नक्षलग्रस्त भागात नाक्षवाद विरोधी मोहीम अधिक आक्रमक करण्यात आली आहे. २०२६ पर्यंत नक्षलवाद संपवण्याचा उद्देश ठेवण्यात आला असून यासंबंधी अनेकदा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी इशारा दिला आहे. छत्तीसगडमध्ये या वर्षी आतापर्यंत राज्यात ८१ माओवादी मारले गेले आहेत, त्यापैकी ६५ बस्तर विभागात मारले गेले. यामध्ये विजापूर आणि इतर सहा जिल्ह्यांचाही समावेश आहे. तसेच कारवाई दरम्यान, मोठ्या प्रमाणात शस्त्र साठा जप्त करण्यात येत आहे.