उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील महाकुंभात रविवारी सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली होती. विवेकानंद सेवा समिती वाराणसीच्या तंबूमध्ये जेवण बनवताना आग लागली आणि वेगाने आग पसरून आसपासचे तंबू यामध्ये जळून खाक झाले होते. सिलेंडर ब्लास्टमुळेच आग लागल्याचे कारण समोर आले होते. मात्र, आता या स्फोटाची जबाबदारी खालिस्तानी संघटनेने घेतली आहे. ‘दैनिक भास्कर’ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
प्रयागराज महाकुंभमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोटाच्या घटनेची जबाबदारी ‘खलिस्तान जिंदाबाद फोर्स’ या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. एका मेल द्वारे त्यांनी स्फोटाची जबाबदारी घेत पिलीभीत चकमकीचा बदला असल्याचे म्हटले आहे. तसेच यामागे कोणालाही हानी पोहोचवण्याचा उद्देश नसून केवळ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना इशारा देण्यासाठीचे हे कृत्य होते असे म्हटले आहे. पिलीभीत चकमकीत आमच्या तीन भावांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी ‘खालसा’ तुमच्या अगदी जवळ आहे. ही तर फक्त सुरुवात आहे, असे मेलमध्ये म्हटले आहे. फतेह सिंग बागी असा उल्लेखही मेलमध्ये असल्याची माहिती आहे.
रविवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास दोन सिलेंडरच्या स्फोटामुळे तंबूमध्ये मोठी आग लागली. अग्निशमन दलाने अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले पण या दुर्घटनेत १८० तंबू जळाले. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथे झालेल्या चकमकीत पोलिसांनी खलिस्तानी कमांडो फोर्सच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त करण्यात आली होती. या दहशतवाद्यांनी पंजाबमधील गुरुदासपूर येथील पोलीस चौकीवर ग्रेनेड आणि बॉम्ब फेकले होते. गुरविंदर सिंग, वीरेंद्र सिंग आणि जसनप्रीत सिंग अशी चकमकीत ठार केलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत.
हे ही वाचा :
तेजस एक्स्प्रेस बंद पडली; चाकरमान्यांना झाला प्रचंड मनस्ताप!
सैफ अली खानला रुग्णालयातून डिस्चार्ज, ६ दिवसानंतर घरी परतला!
फडणवीसांनी गडचिरोलीसाठी आणली भलीमोठी गुंतवणूक
उद्योगपती गौतम अदानी कुंभमेळ्यात सहभागी होत भाविकांना प्रसादाचे वाटप!
प्रयागराजमधील आगीच्या घटनेनंतर राज्य सरकारने सिलेंडर तपासणे अनिवार्य केले आहे. भाविकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने उत्तर प्रदेशच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने बैठक घेतली. या बैठकीत अन्न व नागरी पुरवठा विभागाचे अधिकारी, अग्निशमन दल, एलपीजी सिलेंडर वितरक आणि गॅस कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. बैठकीत जारी केलेल्या सूचनांनुसार सिलेंडर तपासणी बंधनकारक असेल. गळती आढळल्यास सिलेंडरचा पुरवठा बंद केला जाईल, असे निर्देश देण्यात आले आहेत.