देशातील सर्वोच्च शिक्षण संस्थांपैकी एक असलेल्या पवईमधील आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये एका तरुणाने बेकायदेशीररित्या प्रवेश मिळवून विद्यार्थी असल्याचे भासवत तब्बल २० दिवस बेकायदेशीरपणे वास्तव्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिलाल अहमद फैयाज अहमद तेली (२२), मूळचा मंगळुरू (कर्नाटक) येथील असल्याचे उघड झाले असून, त्याला आयआयटी कॅम्पसमधील सुरक्षा पथकाने पकडून पवई पोलिसांच्या ताब्यात दिले होते. बिलाल तेली याने आयआयटी कॅम्पसची रेकी केली होती, तसेच काही टॉपर्सची माहिती मिळवली होती अशी माहिती समोर येत आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला देण्यात आला आहे. बुधवारी बिलालला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिलाल अहमद तेली (वय २२, मूळ रहिवासी मंगळुरू) या युवकाने गेल्या वर्षीही आयआयटी बॉम्बे परिसरात तब्बल एक महिना अनधिकृतपणे वास्तव्य केले होते. चौकशीदरम्यान त्याने सांगितले की, त्याला तंत्रज्ञानाची आवड आहे आणि त्यामुळेच त्याने विविध व्याख्यानांना हजेरी लावली. त्याने १२ वी नंतर सहा महिन्यांचा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कोर्स पूर्ण केला असल्याचेही सांगितले.
मात्र, सुरक्षा यंत्रणांना त्याच्या या कारणावर शंका असून, त्याचा पार्श्वभूमी तपासला जात आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, बिलालचे वडील कपड्यांचा व्यवसाय करतात, मात्र कोविड काळात मोठा तोटा झाल्यामुळे सध्या मंगळुरूमध्ये एकच दुकान उरले आहे. तपास यंत्रणांना बिलालच्या मोबाईलमध्ये Signal आणि Imo यांसारख्या अॅप्स आढळून आले आहे.
त्याने आयआयटी परिसरात अनेक व्हिडीओ शूट केल्याचेही समोर आले आहे. त्याचे म्हणणे आहे की, तो हे व्हिडीओ स्वतःच्या सोशल मीडिया चॅनेलवर टाकण्याच्या उद्देशाने तयार करत होता.
हा प्रकार प्रथम ४ जून रोजी उघडकीस आला, जेव्हा ‘क्रेस्ट’ विभागातील अधिकारी शिल्पा कोटिक्कल यांनी त्यांच्या कार्यालयात एक संशयित व्यक्ती शिरताना पाहिले. त्याने प्रश्न विचारताच त्याने पळ काढला. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजमधून त्याचे चेहरे ओळखून क्विक रिस्पॉन्स टीमला पाठवण्यात आले. मात्र तो सापडला नाही. १७ जून रोजी सायंकाळी ४ वाजता शिल्पा कोटिक्कल यांनी तो पुन्हा लेक्चर हॉलमध्ये विद्यार्थ्यांमध्ये बसलेला आढळून आला असता सुरक्षा रक्षक किशोर कुंभार आणि श्याम घोडविंडे यांनी तत्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेऊन पवई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
हे ही वाचा:
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याबद्दल नौदलाच्या एका कर्मचाऱ्याला अटक!
व्हॉट्सऍप ग्रुुपमध्ये जोडला गेला, १ कोटी गमावून बसला!
हे भय ट्रम्प यांना छळत राहणार |
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरीत एका वीटभट्टी कामगाराने बिबट्याला लोळवले
चौकशीत त्याने २ जून ते ७ जून आणि १० जून ते १७ जून दरम्यान विविध वसतिगृहांमध्ये राहत असल्याची कबुली दिली.
या प्रकरणी पवई पोलिसांनी आयआयटी बॉम्बेच्या सुरक्षा आणि दक्षता विभागाचे कर्मचारी राहुल दत्ताराम पाटील (वय ४८) यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२९(३) आणि ३२९(४) अंतर्गत तक्रार नोंदवली आहे. बुधवारी बिलाल मुंबई गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले असून गुन्हे शाखेने त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
बिलाल तेली पोलिस कोठडीत आहे. दरम्यान, आयआयटी परिसरातील सुरक्षेच्या त्रुटींवरही पोलिसांनी ताशेरे ओढले असून, परिसरात योग्य तपासणीशिवाय लोक शिरत असल्याचे अधोरेखित झाले आहे.
