वडाळा परिसरातील मीठ तलावाच्या सरकारी भूखंडावर माती व ढिगारा टाकून बेकायदा पार्किंग सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वडाळा पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
केंद्रीय मीठ विभागाच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. तक्रारदार जगदीश वालुंजवानी (५५), उपअधीक्षक, मीठ विभाग यांनी दिलेल्या माहितीनुसार, दयाशंकर चौक, ईस्टर्न फ्रीवे जवळील मीठ तलावाच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले होते. मिळालेल्या गुप्त माहितीनंतर तपासणी केली असता, सुमारे ४०० ते ५०० ट्रक माती व ढिगारा टाकून भूखंड भरून काढण्यात आला आणि त्यावर रस्ता तयार करून बेकायदा ‘पे अँड पार्क’ सुरू करण्यात आल्याचे उघड झाले.
या प्रकरणात विशाल गुप्ता, राजेश सरय्या आणि मंगेशी विचारे (सर्व रा. वडाळा) यांचा सहभाग समोर आला आहे. सरय्या यांच्या सांगण्यावरून विचारे यांनी रस्ता तयार केला, तर गुप्ता यांच्या मार्फत त्याठिकाणी ट्रक पार्किंगचा व्यवसाय सुरू करण्यात आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हे ही वाचा:
बुमराहला पहिली ओव्हर देण्याचा हार्दिकचा ‘मास्टरस्ट्रोक
सीएसकेला मोठा धक्का; आयुष म्हात्रे संपूर्ण हंगामातून बाहेर
मुंबईकरांनो बादल्या भरून ठेवा!
या बेकायदा कृत्यामुळे ओलसर जमीन (वेटलँड) क्षेत्राचे मोठे नुकसान झाल्याचेही समोर आले आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३२४ (मिसचीफ) व ३२९ (गुन्हेगारी अतिक्रमण) तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायदा १९८४ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.पोलिस पुढील तपास करत असून आरोपींचा शोध सुरू आहे.







