गेल्यावर्षी १२ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची मुंबईतील वांद्रे येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यामुळे मुंबईत खळबळ उडाली होती. पुढे लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी स्वीकारली. आता या प्रकरणाचा तपास करताना मुंबई पोलिसांनी ४५०० पानी आरोपपत्र दाखल केले आहेत. आत्तापर्यंत या प्रकरणी २६ जणांना अटक करण्यात आली आहे. तर, सिद्दिकी यांची हत्या अनमोल बिश्नोई याच्या सांगण्यावरून घडवून आणल्याचा पोलिसांचा दावा आहे.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांचा मुलगा आणि तत्कालीन आमदार झिशान सिद्दीकी यांचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे वांद्रे येथील पुनर्विकास प्रकल्प तसेच विकासकांकडे रोख असल्याचे झिशान यांच्या जबाबामधून समोर आले आहे. झिशान यांनी त्यांच्या जबाबात काही बिल्डर्सची नाव घेतली असून दोन नेत्यांचीही नावे यात आहेत.
झिशान यांच्या जबाबात ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि भाजपा नेते मोहित कंबोज यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. अनिल परब हे एसआरए प्रकल्पात स्वतंत्र बिल्डर आणण्याचा प्रयत्न करत होते, असं झिशान यांचे म्हणणे आहे. तर, बाबा सिद्दीकी हे रोज डायरी लिहायचे आणि त्यांच्या डायरीमध्ये मोहित कंबोज यांचे नाव असल्याचे म्हटले आहे. हत्येच्या दिवशी म्हणजे १२ ऑक्टोबरच्या दिवशी बाबा सिद्दिकी यांच्या डायरीत मोहित कंबोज यांचा उल्लेख असून हत्येच्या काही तास आधी संध्याकाळी ५:३० ते ६ च्या दरम्यान बाबा सिद्दिकी आणि मोहित कंबोज यांचा संपर्क झाला होता, अशी माहितीही झिशान सिद्दिकी यांनी दिली. मोहित कंबोज यांना वांद्रे पूर्व परिसरात सुरू करायच्या मुंद्रा बिल्डरच्या प्रकल्पाबाबत वडिलांना भेटायचे होते, असं झिशान सिद्दिकी म्हणाले.
झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात झोपडपट्टीवासियांच्या हक्कासाठी लढताना बांधकाम व्यवसायिकांकडून वडिलांना उद्देशून अपशब्द वापरण्यात आल्याचे झिशान सिद्दिकी यांनी म्हटले आहे. संत ज्ञानेश्वरनगर झोपडपट्टी पुनर्विकास योजनेत झोपडपट्टीवासीयांच्या हक्कासाठी लढताना खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आणि विकासकाकडून खेरवाडी पोलिसांच्या माध्यमातून दबाव बनवला गेल्याचा आरोपही झिशान सिद्दिकी यांनी केला आहे. मुंद्रा बिल्डर्सने झोपडपट्टी धारकांना संपर्क साधला असताना त्यांनी माझ्या वडिलांबाबत अपशब्द वापरल्याचे व्हिडिओ माझ्याकडे आले होते, अशी माहितीही झिशान सिद्दिकी यांनी दिली आहे.
झिशान सिद्दिकी यांनी त्यांच्या जबाबात कुठेही बिश्नोई टोळीचा उल्लेख केलेला नाही. तसेच जबाब नमूद केलेल्या सर्व प्रकरणांच्या संबंधाबाबत सविस्तर तपास करण्याची झिशान यांनी मागणी केली आहे. मात्र, पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात बाबा सिद्धीकींच्या हत्येचा आणि पुर्नविकास प्रकल्पाचा कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. बाबा सिद्दीकी यांची हत्या बिष्णोई गँगकडून झाल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा :
त्रिपुरात ५ दिवसांत १४ बांगलादेशी घुसखोरांना अटक, तस्करही ताब्यात!
झाशीहून प्रयागराजला जाणाऱ्या ट्रेनवर दगडफेक; तोडफोडीमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
तामिळनाडूमध्ये इसिस मॉड्यूल प्रकरणी १६ ठिकाणी एनआयएकडून छापेमारी
२६/११ चा दहशतवादी राणाला भारतात आणण्यासाठी एनआयएचे पथक लवकरच जाणार अमेरिकेला
या प्रकरणात नाव आल्यानंतर मोहित कंबोज यांनी म्हटले आहे की, “दिवंगत बाबा सिद्दीकी माझे चांगले मित्र होते. गेल्या १५ वर्षांपासून आम्ही एकमेकांना ओळखत होतो. निवडणुकीसह विविध विषयांवर नियमित बोलायचो. ही घटना घडली, त्यावेळी मला धक्का बसला. त्या कठीण प्रसंगात मी त्यांच्या कुटुंबासोबत रुग्णालयात होतो,” असं स्पष्टीकरण मोहित कंबोज यांनी दिले आहे.