31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरसंपादकीयसुप्रिया सुळे हिंदुराष्ट्राची मागणीही करतील बहुधा...

सुप्रिया सुळे हिंदुराष्ट्राची मागणीही करतील बहुधा…

बोगस सेक्युलर नेते आज ज्योतिर्लिंगाच्या मालकीवरून उर बडवून भांडतायत

Google News Follow

Related

भीमाशंकर हे सहावे ज्योतिर्लिंग कोणाचे? या मुद्यावरून सध्या महाराष्ट्रातील भाजपा विरोधक एकवटले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाब मागतायत. कधी काळी छाती ठोकून प्रभू रामाला काल्पनिक म्हणणारे बोगस सेक्युलर नेते आज ज्योतिर्लिंगाच्या मालकीवरून उर बडवून भांडतायत. त्यामुळे रुलाएगा क्या पगले, हा प्रश्न देशाच्या जनतेला विचारावासा वाटतो आहे. उद्या ही मंडळी हिंदूराष्ट्राची मागणी करतील की काय, असे वाटण्याइतका ओरडा या मंडळींनी केलाय.

देशात १२ ज्योतिर्लिंग असल्याची भारतीयांची हजारो वर्षांपासूनची मान्यता आहे. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी अचानक नवा शोध लावला. सहावे ज्योतिर्लिंग आसामच्या डाकीनी डोंगरावर असल्याचा दावा आसामच्या पर्यटन विभागाने महाशिवरात्रीनिमित्त जारी केलेल्या जाहीरातीच्या माध्यमातून केला. त्यानंतर महाराष्ट्रात एकच गदारोळ माजला. महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी या मुद्यावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर टीकेचा भडीमार सुरू केला भाजपावर महाराष्ट्राची संस्कृती आणि आध्यात्मिक ठेवा पळवण्याचा ठपका ठेवला. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी टीका केली. शिउबाठाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी टीका केली.

आसामच्या मुख्यमंत्र्यांना सहावे ज्योतिर्लिंग डाकीनी डोंगरावर आहे, असे वाटते त्यात एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांचा काय दोष? त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यांनी खुलासा करावा अशी अपेक्षा केली जात आहे. आमच्या राज्यात असलेले भीमाशंकर हेच खरे भीमाशंकर ज्योतिर्लिंग आहे, अशी श्रद्धा ओडीशा आणि छत्तीसगडच्या लोकांमध्ये सुद्धा आहे. परंतु हा काही संघर्षाचा किंवा वादाचा मुद्दा असू शकत नाही.

शिर्डी विमानतळावर आता नाईट लँडिंग सुविधा

अपात्र आमदारांच्या मुद्यावरील सुनावणी संपली; सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला

थोर लढवय्ये आणि महान योद्धे ‘तात्या टोपे’

एअर इंडियाच नाही या कंपन्यांचाही विमान खरेदी महोत्सव

थायलंडच्या लोकांना राम आणि रामायण त्यांचे आहे, ते तिथेच घडले आहे, अशी तिथल्या जनतेची श्रद्धा आहे. तिथले चक्री राजघराणे स्वत:ला रामाचे वंशज म्हणवतात. रामाकियान हे तिथले रामायण. परंतु थाई लोकांच्या श्रद्धेमुळे भारतातील अयोध्येचे महत्व कमी होत नाही. भारतीयांप्रमाणे थाई लोकांच्या मनात प्रभू रामाबाबत प्रचंड श्रद्धा आहे. आसामच्या लोकांना सहावे ज्योतिर्लिंग आमच्याकडेच आहे, असे वाटल्यामुळे महाराष्ट्रातील लोकांना नाराज होण्याचे कारण काय?
जसे थायलंडच्या लोकांनी भारतातील अयोद्धा उचलून नेली नाही, तसेच आसामचे लोकही सह्याद्रीच्या कुशीतील भीमा शंकर उचलून आसाममध्ये नेणार नाहीत.

बरं या विषयावर वाद घालायचा असल्यास हिंदू धर्मावर श्रद्धा आणि निष्ठा असलेले लोक घालतील. हिंदू प्रथा परंपरांची खिल्ली उडवणाऱ्यांना याविषयावर बोलण्याचा हक्क आहे काय? अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हवाला देऊन ते जर या विषयावर बोलणारच असतील तर त्यांना गंभीरपणे घेता येईल काय?

आणि जर बोलायचेच असेल तर कब्जा केलेल्या हिंदूंच्या महाराष्ट्रातील श्रद्धास्थानांवरही त्यांनी तोंड उघडावे. त्यांनी श्री मलंग गडावर बोलावे, गडकिल्ल्यांवरील अनधिकृत मजारींवर बोलावे. मुळात श्रद्धा या विषयातील ओ की ठो कळत नसलेले लोक, हिंदुंच्या श्रद्धांबाबत उदासीन किंवा विरोधात असलेल्या लोकांची ही ओरड आहे. अयोध्येतील रामजन्मभूमीचे अस्तित्व काँग्रेसच्या नेत्यांनी कायम नाकारले, म्हणून हिंदू समाजाचे काय बिघडले. हिंदूंची श्रद्धा इतकी अडीग होती की आज काँग्रेसवाले सुद्धा नाक मुठीत घेऊन राममय झाल्याची नौटंकी करतातय. तेलंगणाचे काँग्रेस नेते रेवंथ रेड्डी यांनी तर राज्यातील ११९ पैकी १०० मतदार संघात राम मंदीर बांधतो, प्रत्येक मंदीर उभारण्यासाठी १० कोटी खर्च करतो, आम्हाला मत द्या, अशी घोषणाच केलेली आहे.

एकेकाळी हिंदुत्व आणि एकूणच हिंदू समाजाचा तिटकारा असलेले डावे, लिबरल, सेक्युलर सगळे एकत्र येऊन देव देव करणार असतील भारताला हिंदुराष्ट्र घोषित करायला काय हरकत आहे? संकष्टीच्या दिवशी मटण खाणाऱ्या सुप्रिया सुळे जर धर्म संस्कृतीबाबत बोलणार असतील. इशरत जहाँ विशिष्ठ धर्माची असल्यामुळे तिच्या दहशतवादी कारवाया नाकारणारे, तिच्या नावाने रुग्णवाहिका सुरू करणारे, गाझा प्रेमी जितेंद्र आव्हाड धर्मावर बोलणार असतील, एकेकाळी रामायणाला काल्पनिक म्हणाऱ्या काँग्रेस पक्षाचे नेते जर भीमाशंकरासाठी भांडणार असतील तर भारत हिंदुराष्ट्र घोषित करायला हरकतच काय? देशाला रामायण महाभारताची गरज नाही, असे पुरोगामी हिंदूविरोधी विधान करणाऱ्या शरद पवार यांच्या कन्येने ज्योतिर्लिंगाबाबत विधाने करणे हेच मोठे आश्चर्य आहे. भीमाशंकराची कड घेण्याआधी त्यांनी वडिलांनी केलेल्या विधानाचा निषेध तरी करावा. त्यानंतर भाजपा नेत्यांना जरुर जाब विचारावा.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा