पहेलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष पेटलाय. भारताची तिन्ही सेनादले पाकिस्तानचा काटा ढीला करतायत. अशा परीस्थिती पाकिस्तानचे मल्टी टास्किंग पाहून जग चकीत झाले आहे. हे मल्टी
टास्किंग थक्क करणारे आहे. एका बाजूला पाकिस्तानी सेना मार खाते आहे, राजकीय नेते भारताला दमबाजी करतायत, त्याच वेळी जगाकडे भीक मागतायत. जगात कटोरा फिरवणे हा तर पाकिस्तानचा अधिकृत व्यवसाय आहे.
मक्केत सुद्धा पाकिस्तानी त्याच करीता जातात. सध्या युद्ध सुरू ठेवण्यासाठी त्यांना पैशाची भीक हवी. झोडणाऱ्या भारतीय सैन्याला रोखण्यासाठी त्यांना जागतिक मध्यस्थीची भीक हवी.
पाकिस्तानची ही कटोरेबाजी पाहण्यापूर्वी, काल काय घडले त्यावर एक दृष्टीक्षेप टाकणे महत्वाचे. काल रात्री सगळा भारत जागा होता. टीव्हीसमोर होता. ७ मे च्या पहाटे जे काही घडले ते अनपेक्षित होते. आज पहाटे जे काही घडले ते
घडणार याची भारतीयांना खात्री होती. असे यापूर्वी ठीक १७ वर्षांपूर्वी झाले होते. २००८ साली जेव्हा पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी मुंबईवर २६/११चा हल्ला केला होता. सगळा देश रात्रभर जागून ही नाचक्की पाहात होता. खदखदत होता. याचा वचपा आपण कधी काढणार? या भावनेने पेटला होता. १७ वर्षांनी तो क्षण आला. पाकिस्तान आगीच्या ज्वाळांनी धगधगतोय, भारताची सेना दले पाकिस्तानला दणका देतायत आणि पाकिस्तानी सैन्य त्राही माम करत मार खातायत, हे दृश्य भारतीयांचा आत्मा सुखावत होते. अर्थात हे काही संपलेले नाही. अजून बराच पल्ला गाठायचा आहे. भारताने ७ मे
पासून ऑपरेशन सिंदूर सुरू केले. ते अद्यापि संपले नसल्याची स्पष्टोक्ती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल केली होती.
भारताने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर पाकिस्तानला इशारा दिला होता, ‘ आम्ही केवळ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त, लष्करी आस्थापनांना हात लावलेला नाही. त्यामुळे प्रत्युत्तर देऊ नका. संघर्ष पेटला तर जबाबदारी तुमची असेल.’ तरीही पाकिस्तानने शेण खाल्लेच. देशात सक्रीय असलेल्या लिब्रांडू, पुरोगामी अर्थात पाकिस्तानच्या बी टीमने ‘निरपराधांचा बळी घेणारे हे युद्ध थांबवा’, अशी हाळी द्यायला सुरूवात केलेली आहे. ही मंडळी दहशतवाद्यांचा हल्ला होतो, तेव्हा कायम कोमात असतात. कावळ्यांची ही काव काव वाढण्याच्या आत युद्ध संपवण्याचे, पाकिस्तानला निर्णायक दणके देण्याचे काम
अजून शिल्लक आहे. मोदी म्हणाले होते, समय सीमित है, लक्ष्य बडा है… काल गुरुवारी रात्री पासून धमाके सुरू झाले. जम्मूच्या पूंछ, अखनूर, द्रास क्षेत्रात तोफांचा भडीमार केला. जम्मू, पंजाब, राजस्थानच्या तोफा, क्षेपणास्त्र आणि ड्रोनने हल्ले केले. सुदैवाने भारताने एस-४००, आकाश आणि स्पायडर क्षेपणास्त्र प्रणालीने भारतीय शहरांना लक्ष्य करण्याचे सगळे प्रयत्न फोल केले. पाकिस्तानला जबरदस्त ड्रोन तडाखा दिला.
हे ही वाचा:
“भारत- पाक तणाव कमी करण्यासाठी हवा राजनैतिक दृष्टिकोन”
पुतिन यांची संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी घेतली भेट
राष्ट्रीय संकटाच्या वेळी संपूर्ण देश सरकार व सैन्य दलांसोबत उभा
हल्ला इस्लामाबाद, रावलपिंडी, कराची, लाहोरमध्ये होत होता. परंतु लाज चव्हाट्यावर येत होती चीनची. पाकिस्तानमधील चीनी बनावटीचे एचक्यू-९ हे हवाई संरक्षण कवच उद्ध्वस्त केले. पाकिस्तानची दोन जेएफ-१७ आणि दोन एफ १६ विमाने पाडली. चीनची हवाई कवच प्रणाली आणि लढाई विमानांना या पुढे कुत्रंही विचारणार नाही, अशी व्यवस्था केली. त्यामुळे चीन चरफडतो आहे. तिच परिस्थिती अमेरिकेची आहे. एफ १६ विमाने ही अमेरीकेने अफगाणिस्तानात लढण्यासाठी पाकला दिली होती. पाकने ती भारतावर आक्रमण करण्यासाठी नव्हती. पाकने ती अट मोडलीच, शिवाय ही विमाने पाडल्यामुळे अमेरिकेचे तोंड काळेही केले. त्याचे उट्टे अमेरिका निश्चितपणे काढणार. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी.वान्स यांनी पाकिस्तानला दणका दिलेलाच आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे, आम्ही भारत किंवा पाकिस्तान कोणालाच रोखू
शकत नाही. नन ऑफ अवर बिजनेस. दरवेळी भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळी नाक खुपसणारा अमेरिका नामानिराळा आहे. भारताच्या दहशतवादी युद्धात आम्ही सोबत आहोत, अशी हमी देतो आहे. पाकिस्तानला सांगतो आहे, तुमचे
तुम्ही पाहून घ्या.
सीमेवर निर्मिती झाल्यापासून पाकिस्तान भीकेवर जगतो आहे. देशाच्या पंतप्रधान पदाची सूत्र हाती आल्यानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पहिला अधिकृत दौरा कटोरा घेऊन जगात भीक मागण्यासाठीच असतो. आधी आखाती
देशांत जाऊन भीक मागायची, नंतर अमेरिकेकडे जायचे. इम्रान खान असो वा शाहबाज शरीफ याला कोणीही अपवाद नाही. युद्धाच्या काळातही पाकिस्तानने ही परंपरा कायम ठेवली आहे. ‘इकोनॉमिक अफेअर डीव्हीजन, गव्हर्नमेंट ऑफ पाकिस्तान’ हे पाकिस्तानचे अधिकृत एक्स हॅण्डल आहे. त्यावर ‘भारताने तडाखा दिल्यामुळे झालेले शेअर बाजार कोसळला, अतोनात नुकसान झाले, ते भरून काढण्यासाठी आमच्या पार्टनर्सनी आम्हाला कर्ज द्यावे. सध्या सुरू असलेला संघर्ष रोखण्यासाठी मदत करावी.’ अशी पोस्ट करण्यात आली होती.
आज सकाळी ९ वाजताची ही पोस्ट आहे. भारत सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने या पोस्टवरून पाकिस्तानची खिल्ली उडवली. भीक मागंने का यह भी कोही तरीका है? हे बहुधा पाकिस्तानला झोंबले. त्यांनी आपले एक्स हॅण्डल हॅक झाल्याचा कांगावा केला. म्हणजे तसाच कांगावा, द रेझिस्टन्स फोर्स या दहशतवादी संघटनेने केला होता. पहलगाम हल्ल्यानंतर आधी पोस्ट केली की या हल्ल्याची जबाबदारी आम्ही घेतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दम दिल्यानंतर आमचे अकाऊंट हॅक झाल्याचा कांगावा केला. भारताशी सुरू असलेला संघर्ष ही पाकिस्तानला भीक मागण्याची नामी संधी वाटत होती. इकॉनॉमिक अफेअऱ डीव्हीजन, गर्व्हर्नमेंट ऑफ पाकिस्तानच्या अकाऊंटवरून त्याचसाठी पोस्ट केली होती. परंतु जड अंतकरणाने ती हटवावी लागली.
पोस्ट हटवली असली तरी पाकिस्तानने भीक मागणे बंद केलेले आहे, असे मानण्याचे काही कारण नाही. इस्लामी उम्मा अर्थ भाईचाऱ्याच्या नावाखाली पाकिस्तानचे नेते पुन्हा एकदा कटोरा घेऊन बाहेर पडणार. आखाती देशांकडे जाऊन पदर पसरणार ही बाब निश्चित आहे. जिथे शक्य असेल तिथे जाऊन पाकिस्तान पैसा मागणार आहे. आयएमएफकडे दोन अब्ज डॉलर्स मागितलेलेच आहेत. पाकिस्तानला आर्थिक सुधारणांसाठी ७ अब्ज डॉलर्सचे कर्ज आयएमएफने मंजूर केले असून आज होणाऱ्या बैठकीत सुमारे दीड अब्जच्या कर्जावर निर्णय होणे अपेक्षित आहे. भारताने हे कर्ज देण्यास आक्षेप घेतला आहे. पाकिस्तान या कर्जाचा वापर युद्धखोरीसाठी करीत असल्यामुळे यापूर्वी मिळालेला पैसा नेमका कशासाठी खर्च
करण्यात आला याचा आढावा घेण्याची मागणीही भारताने केली आहे. पाकिस्तानची जनता गव्हाच्या पिठाला महाग झालेली आहे. परंतु पाकिस्तानचे राजकीय नेते कर्ज काढून भीक मागून भारताशी युद्ध करण्यात मग्न आहेत.
युद्ध सुरू होण्यापूर्वी पाकिस्तानच्या तिजोरीत अवघे १२ अब्ज डॉलर्सची रक्कम होती. ७ मे पासून जो काही दणदणाट सुरू आहे, त्यात किती रक्कम खर्च झाली असेल याची आपण कल्पना करू शकतो. काही काळापूर्वी पाकिस्तान फायनान्शिअल एक्शन टास्क फोर्सच्या रडारवर होता. दहशतवाद्यांना अर्थ पुरवठा करण्याच्या संशयामुळे त्यांना एफएटीएफच्या ग्रे लिस्टमध्ये टाकले होती. अलिकडेच यातून पाकिस्तानची सुटका झाली होती. परंतु पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, आयएसआयचे अधिकारी युनिफॉर्ममध्ये बहावलपूरमध्ये झालेल्या क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यात ठार झालेला पाकिस्तानी
दहशतवादी अब्दुल रऊफच्या जनाज्यात फातिया पढत असल्याचा फोटो भारतीय मुत्सद्दी जगभरातील माध्यमांसमोर ठेवत आहेत. पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवादी कसे एकच आहेत, हे जगासमोर ठेवत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा
पाकिस्तानची रवानगी एफएटीएफच्या ग्रे लिस्टमध्ये होण्याची शक्यता आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)