मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांची खूप मोठी पोलखोल केली होती. शरद पवार कधी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाहीत. हे सत्य त्यांनी सर्वप्रथम महाराष्ट्राला उच्चारवाने सांगितले होते. पवारांच्या दृष्टीने, त्यांच्यासारख्या तमाम पुरोगाम्यांच्या दृष्टीने हा शाहु, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र होता. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांना स्थान नव्हते. राज ठाकरेंच्या टिकेनंतर पवारांच्या समर्थकांनी शिव, शाहु, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र असे बोलायची सुरूवात केली. शातीर पुरोगाम्यांच्या या वैचारीक कोलांट्या कायम सुरू असतात. सध्या पवार आणि त्यांच्या चेल्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांचा विचार गुंडाळून ठेवलेला दिसतोय. जितेंद्र आव्हाड सोवळे नेसतात, शरद पवार तुळजाभवानीच्या मूर्तिची प्राणप्रतिष्ठा करतात, असे चित्र काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राने पाहिले. फुलेंनी ज्या हिंदू कर्मकांडांवर टीका केली, ती सगळी कर्मकांडे शरद पवारांच्या हातून घडवण्याचे पाप आव्हाडांनी केले. हे पाप ते कुठे फेडणार हा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडलेला आहे.
‘ब्राह्मण देवतांचे नाव घेऊन कायम शुद्रांच्या बुद्धीवर अंधश्रद्धेचे जाळे टाकतात, जेणे करून ते कधीही विद्रोह करणार नाहीत’, असे विद्रोही विचार फुले यांच्या ‘गुलामगिरी’ या ग्रंथात ठिकठिकाणी येतात. हिंदू कर्मकांडे, देवता, वेद, स्मृती, पुराणे, उपनिषद हे ग्रंथ यापैकी काहीही फुले यांच्या टिकेतून सुटलेले नाहीत. राम-कृष्णादी देवतांना फुले यांनी कायम लक्ष्य बनवले.
पवार यांनी कायम महात्मा फुले यांच्या विचारांशी बांधिलकी व्यक्त केली. त्यांचे एकेकाळचे चेले छगन भुजबळ यांनी फुलेंच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी समता परिषदेची स्थापना केली. फुले यांचे नाव घेऊन हिंदुत्ववाद्यांना झोडण्याचा उपक्रम त्यांनी दीर्घकाळ राबवलेला दिसतो. त्यांच्या दुर्दैवाने अलिकडे हिंदुत्ववाद्यांनी बरे दिवस आलेले आहेत. पुरोगाम्यांचा दुतोंडीपणा लोकांच्या लक्षात येऊ लागलाय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांचे सोयीचे विचार घ्यायचे, अडचणीचे वाटतील ते सोडून द्यायचे ही पवारनीती लोकांच्या लक्षात आली. त्यांच्या कोलांट्याही लक्षात आल्या.
जितेंद्र आव्हाड हे पवारांचे पट्ट शिष्य. त्यांच्या पेक्षा एक पाऊल पुढे राहणारे. पवारांनी अफजल खानाला क्लीनचीट दिली, तर आव्हाड औरंगजेबाला क्लीनचीट देऊन मोकळे व्हायचे. पवारांनी एक केले तर आव्हाड दोन करायचे. सकाळ संध्याकाळ फुले यांचे नाव घेणारे आव्हाड यांनी अलिकडेच असा एक उपक्रम हाती घेतला की फुलेंचा स्वर्गस्थ आत्मा निश्चितपणे कळवळला असेल. आता माझे विचार कोण पुढे नेणार असा प्रश्न त्यांना पडला असेल. कारण आव्हाडांनी तुळजाभवानीचे मंदीर बनवले. त्यात प्राणप्रतिष्ठा सोहळा केला. पवार रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात गेले नाही, त्याचे अंशत: पापक्षालन व्हावे असा बहुधा आव्हाडांचा हेतू असावा. मंदीरात तुळजाभवानीची प्राणप्रतिष्ठा करून आव्हाड थांबले नाहीत, इथे त्यांनी नवग्रहांचे मंदीरही बनवले आहे. काय म्हणावे याला? पुरोगाम्यांच्या दृष्टीने महापातक, नरकात जाऊनही जे फेडता येणार नाही असे हे पाप. हे सगळे मुहुर्तपाहून केले गेले. या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी जो व्हीडियो जितेंद्र आव्हाडांनी बनवला, त्यात तमाम ब्रिगेडींचे लक्ष्य ठरलेल्या समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेली दुर्गे दर्घट भारी… ही आरती होती. शरद पवार, सपत्नीक या प्राणप्रतिष्ठे सोहळ्यात सहभागी झाले. महाराष्ट्रातील सगळ्या पुरोगाम्यांना भोवळ यावी असा हा प्रकार आहे.
हे ही वाचा..
पाकिस्तानमधून येणाऱ्या सर्व पोस्टल, पार्सल सेवांवर भारताकडून बंदी
पावसाळ्यात उगवणारे रहस्यमय औषधी वनस्पती कोणते ? जाणून घ्या फायदे
भारतीय बंदरांवर पाकिस्तानी झेंडाधारी जहाजांना ‘नो एन्ट्री’
इस्लामाबादच्या आर्थिक कणा मोडण्याचे नियोजन
अलिकडेच अज्ञानेश महाराव पवारांच्या सोबत संभाजी ब्रिगेडच्या व्यासपीठावर एकत्र होते. पुरोगामींचे मसीहा समोर असल्यामुळे त्यांना चेव आला आणि ते स्वामी समर्थांच्याबाबत बरळले. नंतर भाजपाचे राजेश शिरवाडकर यांनी दणका दिल्यानंतर त्यांनी याप्रकरणी नाक रगडून माफी मागितली. त्या महारावांच्या काळजावर या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे किती साप लोटले, असतील याचा विचार करा. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात शरद पवार यज्ञात आहुती देतायत, साजूक तूप वाया घालवयात हे सगळे महाराष्ट्राने पाहीले. कळस तर तेव्हा झाला जेव्हा शरद पवारांच्या उत्तम आरोग्यासाठी ब्रह्मवृंद मंत्रोच्चार करतायत आणि पवार त्या ब्राह्मणांना नमस्कार करतायत, हा सोहळा सुद्धा त्याला जोडून झाला. अवघ्या महाराष्ट्रात ब्राह्मण विरुद्ध बहुजन अशी आग पेटवणाऱ्यांना इंगळ्या डसल्या असतील हे सगळं पाहून.
आता इतके सगळे पुरोगामीत्व मंत्रोच्चाराच्या गजरात वाहून गेलेले असताना आव्हाडांनी चक्क जगद्जननी तुळजा भवानीलाच पुरोगामीत्वाचा टीळा लावण्याचा प्रयत्न केला. म्हणे तुळजाभवानी हे बहुजनांचे दैवत. आव्हाडांनी फार नाही, थोडी तर लाज बाळगायला हवी होती. नवरात्रौत्सवात ज्या महिषासुरू मर्दीनीचे स्तोत्र जगभरात ऐकले जाते, त्याची रचना केली आदी शंकराचार्यांनी. ते केवळ बहुजनांचे दैवत कसे असेल? कधी काळी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव यांना सोयीचे वाटत नव्हते, तेव्हा फक्त ही मंडळी शाहु, फुले, आंबेडकरांचा गरज करताना दिसत होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांच्या आधी एक नेता रायगडावर गेला, तिथली माती डोक्याला लावून त्याने महाराजांचे आशीर्वाद घेतले. महाराजांनीही त्यांना भरभरून आशीर्वाद दिले असावेत, इतके की हा गडी पंतप्रधान पदावरून खाली उतरण्याची चिन्हेच दिसत नाहीयेत. त्यामुळे आता पवार सुद्धा छत्रपती शिवरायांचे नाव घेतायत. त्यांचे चेले तुळजाभवानीचा जयघोष करतायत. भगवे सोवळे पांघरतायत. हे जे काही दिसते आहे, ते परीवर्तन आहे, सोयीचे राजकारण आहे, की नेहमीप्रमाणे पुरोगामी कोलांट्या आहेत. पवारांना स्वत:च्या आरोग्यासाठी ब्राह्मणांनी मंत्रोच्चार करायला हरकत नाही, ब्राह्मणांनी मुंजी कराव्यात, पूजा सांगाव्यात, झाल्यास अत्यंसंस्कारही करावेत, फक्त राजकारणात येऊन त्यांच्या राजकारणाचा खेळखंडोबा करू नये एवढी त्यांची अपेक्षा असावी.
क्या मिलीये ऐसे लोगो से जिनकी फितरत छुपी रहे
नकली चेहरा सामने आये असली सुरत छपी रहे…
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)