व्हिएतनाममध्ये १५ भारतीय पर्यटकांचा बळी घेणाऱ्या भीषण स्पीडबोट दुर्घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने मोठी कारवाई करत बोटीच्या कॅप्टनला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक तपासात जलवाहतूक सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.
ही दुर्घटना व्हिएतनाममधील लोकप्रिय पर्यटनस्थळ फु क्वॉक (Phu Quoc) बेटाजवळ घडली. स्पीडबोटमध्ये ३२ भारतीय पर्यटक आणि चार व्हिएतनामी कर्मचारी प्रवास करत होते. बेटावरून किनाऱ्याकडे परतत असताना जोरदार वारे आणि उंच लाटांमुळे बोट अचानक उलटली. अपघातात १५ भारतीय पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. काहींना स्थानिक बचाव पथक आणि जवळील बोटींच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
हे ही वाचा:
ब्रह्मपुत्रावर चीनचा ‘टाईम बॉम्ब’?
सुट्टे पैसे नाहीत म्हणून कंडक्टरने कर्नाटकच्या मंत्र्यालाच उतरवले!
पहिल्या हायड्रोजन ट्रेनचा प्रवास ८९ किलोमीटर
दुर्घटनेनंतर व्हिएतनाम पोलिसांनी ५७ वर्षीय बोट चालकाला ताब्यात घेतले असून, जलमार्ग सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि निष्काळजीपणाच्या आरोपांखाली त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवामानाची प्रतिकूल परिस्थिती असतानाही प्रवास सुरू ठेवण्यात आला का, सुरक्षेच्या नियमांचे पालन झाले होते का आणि प्रवाशांसाठी आवश्यक सुरक्षा उपाय पुरेसे होते का, याचा तपास अधिकारी करत आहेत.
या दुर्घटनेनंतर भारत सरकार आणि व्हिएतनाम प्रशासन समन्वयाने काम करत असून, मृतांच्या पार्थिवांना भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. भारतीय दूतावासानेही पीडित कुटुंबांना मदत करण्यासाठी विशेष नियंत्रण कक्ष सुरू केला असून, जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती दिली आहे.
या भीषण दुर्घटनेमुळे व्हिएतनाममधील जलपर्यटनाच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणातील चौकशी अहवालानंतर संबंधितांवर आणखी कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.







