रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५३ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून अभिवादन केले. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या अलीकडील एकत्र विमानप्रवासाच्या चर्चेवर भाष्य करताना उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. “विमानापेक्षा इमान महत्त्वाचे असते,” असे म्हणत त्यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतरच्या राजकीय घडामोडींचा संदर्भ दिला. जनतेने शिवसेना-भाजप युतीला एकत्र सत्तेचे जनादेशरूपी तिकीट दिले होते, मात्र उद्धव ठाकरे यांनी स्वार्थासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेत जनमताशी बेईमानी केली, असा आरोप त्यांनी केला.
एकनाथ शिंदे म्हणाले की, २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी “कपटी मित्र किती घातक असतो” याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. त्यामुळे आज कोणत्याही प्रकारचे राजकीय प्रयत्न करून काहीही साध्य होणार नाही. फडणवीस अत्यंत अनुभवी आणि सावध नेते आहेत. त्यामुळे या विषयावर अधिक काही बोलण्याची गरज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा:
अज्ञात क्षेपणास्त्राने तेलवाहू टँकरला लक्ष्य; तीन दिवसांतील दुसरी घटना
इंग्लंडमध्ये वैभवची खरी परीक्षा!
११ वर्षांनंतर सेशेल्स दौरा, पंतप्रधान मोदी दाखल
फुटबॉलच्या महासत्तांना छोट्या देशाचा मोठा धक्का!
उद्धव ठाकरे सध्या राज्यभर सभा घेत फिरत असले तरी त्यांचा जनाधार कमी झाला असल्याचा दावा करत शिंदे म्हणाले की, “यावेळीही मीच त्यांना घराबाहेर काढले आहे.” मराठीतील “वरातीमागून घोडे” या म्हणीचा उल्लेख करत त्यांनी उद्धव ठाकरे उशिरा जागे झाल्याची टीका केली. “जो बुंद से गयी, वो हौद से नहीं आयेगी,” असे म्हणत गमावलेला जनाधार परत मिळवणे त्यांच्यासाठी कठीण असल्याचा टोला त्यांनी लगावला.
शिवराज्याभिषेक सोहळ्याबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, रायगडावर अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने सोहळा पार पडला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने राज्यातील सर्व कामे सुरळीत होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत सुरू असलेल्या चर्चांवरही त्यांनी भाष्य केले. या पदाबाबतचा निर्णय लवकरच होईल आणि त्याची अधिकृत माहिती सर्वांना मिळेल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, रायगडच्या पालकमंत्रिपदावरून शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विधान परिषद निवडणुकीत अनिकेत तटकरे यांना पाठिंबा देण्याच्या बदल्यात भरत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्रिपद देण्याबाबत अनौपचारिक सहमती झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे रायगडचा पुढील पालकमंत्री कोण होणार, याकडे आता राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.







