दिल्लीत सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी मुंबईतील दादर परिसरात सोमवारी विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. चैत्यभूमी परिसरात मोठ्या संख्येने आंदोलक जमा झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. मात्र, या आंदोलनाला परवानगी नसल्याचं सांगत पोलिसांनी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचं दिसून आलं. तर काही ठिकाणी विद्यार्थिनी आणि महिलांना ताब्यात घेतलं.
दरम्यान, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी एक महिला तिच्या मुलासह दादर परिसरात आली होती. मात्र पोलीस आपल्याला या परिसरात थांबू देत नसल्याचा आरोप तिने केला. आम्हाला चैत्यभूमीवर उभं राहू दिलं जात नाही, पोलीस बाजूला काढतात, असं ती माध्यमांना सांगत होती. त्याचवेळी त्या ठिकाणी पोलीस दाखल झाले आणि त्यांनी त्या महिलेला ताब्यात घेतलं. त्याचवेळी त्या महिलेसोबत असलेल्या मुलाने टाहो फोडल्याचं दिसून आलं. हा मुलगा रडताना तिची आई तिला समजावताना दिसली. तसेच आजूबाजूच्या लोकांनीही त्या मुलाला धीर देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी या आई आणि मुलालाही ताब्यात घेतल्याचं दिसून आलं.
आंदोलकांवरील लाठीचार्ज नंतर आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत सरकारवर टीका केली. ते म्हणाले, ‘किती ही भ्याड राजवट. परीक्षेचे पेपर फुटल्याप्रकरणी न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आणि त्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्यांवर क्रूर बळाचा वापर केला जात आहे.’
या घडामोडींच्या पार्श्वभुमीवर मुंबई पोलिसांनी शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत प्रतिबंधांत्मक निर्बंध लागू करण्याची घोषणा केली आहे. या प्रतिबंधांत्मक आदेशानुसार २३ जुलैपासून ६ ऑगस्ट २०२६ पर्यंत संपूर्ण बृहन्मुंबई क्षेत्रात ५ किंवा त्यापेक्षा अधिक लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच आंदोलन, मोर्चा काढणे आणि लाऊड स्पीकरचा वापर करणे यासारख्या गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे.
हे ही वाचा:
राम मंदिर देणगी प्रकरणी राजकारण नको!
डेंग्यूवर ‘सुपर शिल्ड’! भारतात पहिल्या डेंग्यू लसीला मंजुरी







