पश्चिम बंगालमधील निवडणुकांनंतर तृणमूल कॉंग्रेसच्या गोटात अनेक राजकीय हालचाली सातत्याने सुरू असून काही खासदारांनी राजीनामासत्रही चालवले आहे. तसेच पक्षातील अंतर्गत कलह देखील चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले. अशातच तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्यावर जाहीरपणे शाब्दिक हल्ला केल्यानंतर आणि पक्षाध्यक्ष ममता बॅनर्जी यांना अभिषेक आणि स्वतःपैकी एकाची निवड करण्याचा अल्टिमेटम दिल्यानंतर, तृणमूलचे ज्येष्ठ खासदार कल्याण बॅनर्जी यांनी सामंजस्याची भूमिका घेतली आहे. त्यांनी अभिषेक बॅनर्जी यांना ‘माझ्या मुलासारखा’ असे संबोधले असून मुलाच्या चुका माफ करणे हे वडिलांचे कर्तव्य असल्याचे म्हटले आहे.
तृणमूलमधील वाढत्या मतभेदांच्या वृत्तांदरम्यान एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना कल्याण बॅनर्जी म्हणाले, “तो (अभिषेक) माझ्या मुलासारखा आहे. मुलाने केलेल्या सर्व चुका माफ करणे हे वडिलांचे कर्तव्य आहे.” कल्याण बॅनर्जी यांची सामंजस्याची वक्तव्ये, या आठवड्याच्या सुरुवातीला त्यांनी केलेल्या वक्तव्यांच्या अगदी विरुद्ध आहेत.
यापूर्वी त्यांनी अभिषेक बॅनर्जींवर अहंकाराचा आरोप केला होता आणि पक्षाच्या अडचणींसाठी त्यांना जबाबदार धरले होते. “तो खूप अहंकारी माणूस आहे. हे समजून घेतले पाहिजे की त्याच्यामुळे, अभिषेक बॅनर्जीमुळे आज पक्ष उद्ध्वस्त झाला आहे. आपण तो गमावला आहे. सगळेच हेच म्हणत आहेत,” असे कल्याण बॅनर्जी म्हणाले होते. याशिवाय कल्याण बॅनर्जी यांनी ममता यांना स्पष्ट निर्वाणीचा इशारा देत म्हटले होते की, “आम्हाला निवडा किंवा अभिषेकला.” यानंतर अचानक शनिवारच्या वक्तव्यांमधून त्यांच्या तृणमूलच्या राष्ट्रीय सरचिटणीसांबद्दलच्या भूमिकेत नरमाई आल्याचे दिसून आले.
हे ही वाचा:
खाद्यपदार्थांच्या पॅकिंगसाठी पिन-स्टेपलर वापरण्यास बंदी
AN-32 विमान अपघातात हवाई दलाचे पाच जवान हुतात्मा
आधी अंतरिम करार लागू होईल, त्यानंतर अणुकार्यक्रमावर चर्चा!
रिलायन्स अनिल अंबानी समूहाच्या दोन माजी अधिकाऱ्यांना अटक
बंडखोर खासदारांचा एक गट लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्याकडे जाण्याच्या तयारीत असल्याच्या वृत्तांवरही कल्याण बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली. “त्यांना जे करायचे आहे ते करू द्या. त्यांना भाजपच्या आश्रयाखाली राहावे लागेल. हा सगळा एक डाव आहे. ते आपल्या मतदारसंघांच्या विकासाचे कारण देतात, पण जे आपल्या मतदारसंघात जाऊही शकत नाहीत, ते काय काम करणार? जेव्हा पश्चिम बंगालमध्ये लोकशाहीच संपली आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करूनही गेल्या एका महिन्यात काय विकास झाला आहे? भाजप आम्हाला त्रास देत आहे, पोलीस आम्हाला त्रास देत आहेत. पश्चिम बंगालमधील कोणत्याही विरोधी पक्षाला आम्ही ज्या परिस्थितीचा सामना करत आहोत, तसा सामना यापूर्वी कधीही करावा लागला नाही. जे १९ खासदार भाजपमध्ये जात आहेत, त्यांना भाजप स्वीकारणार नाही,” असे ते म्हणाले.







