मुंब्रा येथे झालेल्या रेल्वे अपघातानंतर सगळीकडे त्याची चर्चा सुरू आहे. शहरात वाढणाऱ्या लोंढ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज या घटनेमुळे पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाकरे बंधूंच्या युतीपेक्षा या गंभीर प्रश्नांकडे माध्यमांनी पाहावे अशी विनंती करण्यात आली आहे. एक्सवर राज ठाकरे यांनी पोस्ट लिहीत माध्यमांना हे आवाहन केले आहे.
त्यांनी लिहिले आहे की, आज मुंबईत जो रेल्वे अपघात झाला तो दुर्दैवी आहे. या अपघातात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला, पण अशाच घटना रोज मुंबईत घडत आहेत. मुंबईत रोज प्रवासी जखमी होत आहेत आणि तरीही कोणाला काहीही देणं-घेणं नाहीये. मुंबई रेल्वेसाठी एक वेगळं महामंडळ हवं, ही मागणी गेले कित्येक वर्षांपासून केली जात आहे. आम्ही सुद्धा ही मागणी केली होती, पण आजपर्यंत एकाही सरकारने या मागणीकडे लक्ष दिलं नाही.
राज ठाकरेंनी म्हटले आहे की, आपलं सगळं लक्ष फक्त निवडणुका आणि प्रचार यावरच केंद्रित आहे. राज ठाकरे-उद्धव ठाकरे युती करणार का? या प्रश्नापेक्षा आज मुंबईत प्रवास कसा होतोय, शहरांमध्ये आणि एकूणच राज्यात लोकं कशा अवस्थेत जगत आहेत, हे प्रश्न अधिक महत्त्वाचे आहेत. माध्यमं हे प्रश्न उपस्थित करणार आहेत का? सरकारांना या प्रश्नांची उत्तरं मागणार आहेत का? कोणकोणाशी युती होणार, कोण काय म्हणाला, हे सगळं खरोखरच या गंभीर प्रश्नांपुढे क्षुल्लक आहे. आपण लोकांच्या प्रश्नांकडे वळणार आहोत का?
हे ही वाचा:
२०२५ मध्ये फॉर्म १६ दिसणार वेगळा
प्रेमप्रकरणातून राजा रघुवंशीची झाली हत्या…
मोदींच्या ११ वर्षांच्या काळाची नोंद सुवर्णाक्षरात व्हायला हवी
ICC न्यायाधीशांवर निर्बंध : इराणने केला निषेध
राज ठाकरेंनी लिहिले की, आज शहरांचं नियोजन पूर्णपणे विस्कटलं आहे. प्रचंड लोंढे येत आहेत. त्यांच्यासाठी मोठे रस्ते, ब्रिज, मेट्रो बांधली जात आहेत. उंच उंच इमारतींना परवानगी दिली जात आहे, पण पार्किंगचं काहीही नियोजन नाही. प्रत्येक शहरात ट्रॅफिकची गंभीर समस्या आहे. नवनवीन रस्ते, मेट्रो बांधून काहीही फरक पडत नाहीये, तरीही कुठलंच सरकार शहर नियोजनाचा किंवा बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांचा विचार करत नाहीये. मी स्वतः मुंबईत रेल्वेने बराच काळ प्रवास केला आहे. पण तेव्हा परिस्थिती थोडी बरी होती. आता रेल्वे स्टेशनवरची गर्दी पाहून धडकी भरते. हे खासदार, आमदार, मंत्री परदेशात जातात – तिथून काही शिकून येतात का? परदेशात अशी घटना घडली असती, तर तिथे ती कशी हाताळली गेली असती? आपल्याकडे मात्र काहीही नाही. इथे माणसाच्या जीवाला किंमतच नाही.
