उत्तर प्रदेशात दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर, भिवंडी आणि पंजाबमधील त्यांच्या कथित दहशतीच्या कारवायांबाबत धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. पाकिस्तानस्थित ‘शाहजाद भट्टी’ याच्या मार्गदर्शनाखाली हे दोघे काम करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला आरोपी दानियाल अशरफ हा काही काळ भिवंडीत वास्तव्यास होता. यावेळी त्याने नारपोली पोलीस ठाण्याचे फोटो आणि व्हिडिओ काढून ते पाकिस्तानमधील आपला हँडलर शाहजाद भट्टी याला पाठवले होते. भट्टी हा ‘तहरीक-ए-तालिबान हिंदुस्तान’चा मास्टरमाइंड मानला जातो. या दोघांना पोलीस ठाण्यांना लक्ष्य करून अस्थिरता निर्माण करण्याचे आदेश देण्यात आले होते.
शाहजाद भट्टी याचे लॉरेन्स बिश्नोई गँगशीही लागेबांधे असल्याचे समोर आले आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये झालेल्या एनसीपी नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येतील एका आरोपीला आश्रय देण्यातही भट्टीचा हात असल्याचे म्हटले जात आहे. याव्यतिरिक्त, गेल्या वर्षी २५ नोव्हेंबर रोजी गुरदासपूर पोलीस ठाण्यावर झालेल्या ग्रेनेड हल्ल्यातही भट्टीचा सहभाग असल्याचे तपासात उघड झाले आहे. या हल्ल्यात त्याचा साथीदार हरगुनप्रीत सिंग याने ग्रेनेड फेकला होता, ज्याची कबुली त्याने दिली आहे.
हे ही वाचा:
राजौरीत ‘ऑपरेशन शेरवाली’! घनदाट जंगलात दहशतवाद्यांचा शोध सुरू
मुंबईत पुन्हा CNG महागला; किलोमागे ८६ रुपये
“ट्रम्प यांचे दावे म्हणजे सत्य आणि असत्याचे मिश्रण”
स्वदेशी ‘SGV-500 स्कॉर्पियन’- मानवरहित युद्ध वाहन; काय आहेत वैशिष्ट्ये?
महाराष्ट्र एटीएसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या (ISI) पाठिंब्याने हे कृत्य केले जात आहे. शाहजाद भट्टी हा सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतातील तरुण आणि असुरक्षित मुलांना पैशांचे आमिष दाखवून आणि गँगस्टर्सचे उदात्तीकरण करून आपल्या जाळ्यात ओढतो. त्यानंतर त्यांना रेकी (पाळत ठेवणे) करणे आणि हल्ले करण्यासारखी कामे सोपवली जातात.सध्या उत्तर प्रदेश एटीएसने बाराबंकी आणि गोरखपूर येथून दानियाल अशरफ आणि कृष्ण मिश्रा या दोन आरोपींना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.







