देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार, २ मे रोजी केरळमधील तिरुअनंतपुरम येथे विझिंजम आंतरराष्ट्रीय बंदर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाला नरेंद्र मोदी यांच्यासोबत केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन आणि काँग्रेस खासदार शशी थरूर हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते. ‘इंडी’ आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंदराचे उद्घाटन केल्यानंतर, केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांना विरोधी पक्षांच्या ‘इंडी’ आघाडीचे स्तंभ म्हणून वर्णन केले. तर, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या काँग्रेस खासदार शशी थरूर यांना सांगितले की, हा उद्घाटन समारंभ अनेक लोकांची झोप उडवेल. शुक्रवारी केरळमधील मुख्यमंत्री पिनारायी विजयन आणि काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या उपस्थितीत एका मोठ्या बंदर प्रकल्पाचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडी आघाडीवर टीका केली. दोन्ही विरोधी नेत्यांची व्यासपीठावर उपस्थिती असताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, या कार्यक्रमामुळे अनेकांची झोप उडेल. यावेळी नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर मिश्कील हास्यही होते.
रशिया- युक्रेन युद्धावर भारताची भूमिका, भारताची लसीकरण मोहीम, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी राजनैतिक चर्चा अशा अनेक मुद्द्यांवर कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारची प्रशंसा उघडपणे केली. यानंतर त्यांच्याच पक्षातून त्यांच्या विचारधारेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. तरीही त्यांनी नरेंद्र मोदींच्या निर्णयांवर स्तुतिसुमने उधळली. अलिकडेच, भाजप नेते आणि केरळ युनिटचे अध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांनीही थरूर यांचे काँग्रेसच्या काही समजूतदार नेत्यांपैकी एक असे वर्णन केले. या कार्यक्रमात तेही उपस्थित होते.
हे ही वाचा :
आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्या पठाण खानला राजस्थानमधून अटक
संपूर्ण काश्मीरमध्ये सर्च ऑपरेशन, ३ हजारांहून अधिक लोक ताब्यात!
पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय यंत्रणांवर १० लाखांहून अधिक सायबर हल्ले
पंकजा मुंडेंना अश्लील संदेश पाठवणाऱ्या एकाला पुण्यातून अटक
विझिंजम आंतरराष्ट्रीय बंदर हे अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडने (APSEZ) सार्वजनिक-खाजगी भागीदारी मॉडेलवर बांधले आहे. हे भारतातील पहिले खोल पाण्यातील ट्रान्सशिपमेंट बंदर आहे आणि त्याची एकूण अंदाजे किंमत ८,८६७ कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. डिसेंबर २०२४ मध्ये व्यावसायिक कामकाजासाठी याला मान्यता देण्यात आली. भविष्यात त्याच्या ट्रान्सशिपमेंट हबची क्षमता तिप्पट केली जाईल. मोठ्या मालवाहू जहाजांना सामावून घेण्याच्या उद्देशाने बंदराची रचना करण्यात आली आहे. आतापर्यंत, भारतातील ७५ टक्के ट्रान्सशिपमेंट कामे परदेशी बंदरांवर होत होती, त्यामुळे देशाला मोठ्या प्रमाणात महसूल तोटा होत होता.