आयपीएलने देशभरात लोकप्रियता मिळवली असली तरी त्याचवेळी ऑनलाइन सट्टेबाजी आणि तथाकथित फॅन्टसी गेमिंग अॅप्सच्या वाढत्या व्यसनाने पालकांमध्ये गंभीर चिंता निर्माण केली आहे. देशभरातील अनेक पालकांनी क्रिकेटपटूंवर आणि बीसीसीआयवर सट्टेबाजीला अप्रत्यक्ष पाठिंबा दिल्याचा आरोप केला आहे.
महानगरांपासून ते लहान शहरांपर्यंत तरुण आणि किशोर वयातील मुले फॅन्टसी गेमिंग अॅप्सच्या आहारी जात असून, लवकर पैसे कमावण्याच्या लालसेपोटी मोठे आर्थिक नुकसान सहन करत आहेत. त्याचा परिणाम शिक्षणावर आणि मानसिक आरोग्यावर होत असल्याचेही पालकांनी नमूद केले.
दिल्लीचे ५५ वर्षीय मनीष यांनी सांगितले की, त्यांच्या १६ वर्षांच्या मुलाने ऑनलाइन सट्टेबाजीमध्ये ५० हजार रुपये गमावले. त्यानंतर त्यांनी मुलाच्या मोबाईलमधून तीन फॅन्टसी अॅप्स हटवले. “आपले क्रिकेट हिरो इतक्या धोकादायक गोष्टींचा प्रचार का करत आहेत? क्रिकेट पूर्वी प्रेरणा देणारे होते. आता ते आपल्या मुलांना व्यसनाच्या गर्तेत लोटत आहे,” असे त्यांनी सांगितले.
एका इतर पालकांनीही निराशा व्यक्त करत म्हटले की, “बीसीसीआय फक्त पैशांमध्ये गर्क आहे. त्यांना आमच्या मुलांचे काही वाटत नाही. आघाडीचे क्रिकेटपटू या अॅप्सचा प्रचार करत आहेत आणि बोर्ड त्यांना रोखत नाही. हे अॅप्स मोठ्या स्पर्धांना प्रायोजित करत आहेत. हे लोक स्मार्ट आहेत – ते याला ‘फॅन्टसी स्पोर्ट्स’ म्हणतात, पण यात खरे पैसे गुंतवले जातात.”
एका सामन्याच्या वेळी काही पालकांनी स्टेडियममध्ये किशोर वयाच्या मुलांना थेट फोनवर सट्टा लावताना पाहिल्याचे सांगितले. “आम्ही तरुणांना स्टेडियममधूनच कॉलवर थेट बेटिंग करताना पाहिले,” अशी प्रतिक्रिया एका पालकाने दिली.
काही वेळा कायदा अंमलबजावणी संस्थांनी आयपीएलमध्ये अवैध सट्टेबाजी नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे, पण आता अधिक धोकादायक गोष्ट म्हणजे हे मोबाइल अॅप्स, जे फॅन्टसी गेमिंगच्या नावाखाली खुलेआम कार्यरत आहेत.
समालोचक आणि पालकांचे म्हणणे आहे की, जगातील सर्वात श्रीमंत आणि प्रभावशाली क्रिकेट संस्था बीसीसीआयने याबाबत नैतिक जबाबदारी घ्यावी. मात्र बोर्डाची शांतता पालकांची चिंता वाढवते आहे, विशेषतः जेव्हा प्रमुख क्रिकेटपटू या अॅप्सच्या जाहिरातींमध्ये दिसतात.
या पार्श्वभूमीवर, फॅन्टसी गेमिंगवर बंदी घालण्याची आणि क्रिकेटपटूंनी या अॅप्सचा प्रचार करू नये, अशी मागणी आता जोर धरत आहे. “क्रिकेटपटूंना आपण देवासारखी पूजा करतो, पण आता लोकप्रियतेसोबत जबाबदारीही यावी,” असं ठाम मत अनेक पालक आणि चाहत्यांनी मांडलं आहे.
