भारतीय कुस्तीविश्वातील आघाडीची महिला कुस्तीपटू विनेश फोगट हिचे २०२६ एशियन गेम्समध्ये खेळण्याचे स्वप्न अखेर भंगले आहे. दीर्घ कायदेशीर लढाईनंतर ट्रायलमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाल्यानंतरही विनेशला उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. महिला ५३ किलो वजनी गटाच्या निवड चाचणीत आशियाई कांस्यपदक विजेती मीनाक्षी गोयल हिने विनेशचा ६-४ अशा फरकाने पराभव करत एशियन गेम्सच्या संघातील तिच्या आशांवर पाणी फेरले.
दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये झालेल्या या निवड चाचणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. कारण गेल्या काही आठवड्यांपासून विनेश फोगट आणि भारतीय कुस्ती महासंघ यांच्यातील वाद चर्चेचा विषय ठरला होता. सुरुवातीला महासंघाने तिला ट्रायलमध्ये सहभागी होण्यास परवानगी नाकारली होती. त्यानंतर विनेशने न्यायालयाचे दार ठोठावले. दिल्ली उच्च न्यायालयाने तिला दिलासा दिल्यानंतरही प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. अखेर सर्वोच्च न्यायालयाने ट्रायलमध्ये सहभागी होण्यास परवानगी दिली आणि तिच्यासाठी एशियन गेम्सचे दार पुन्हा उघडले गेले होते.
हे ही वाचा:
वैभव सूर्यवंशी सध्या जगातील सर्वोत्तम फलंदाज – शुभमन गिल
कपडे फाडले, अंडी फेकली… ‘चोर चोर’च्या घोषणा देत अभिषेक बॅनर्जींना थोबडवले
बनावट सही प्रकरणी अभिषेक बॅनर्जींना सीआयडीचे समन्स
सुजलॉन एनर्जीला सेबीचा मोठा दणका
मात्र मैदानावरील निकाल तिच्या अपेक्षेप्रमाणे लागला नाही. मीनाक्षी गोयतविरुद्धच्या उपांत्य फेरीतील सामना अत्यंत चुरशीचा झाला. दोन्ही खेळाडूंनी आक्रमक खेळ दाखवला, पण निर्णायक क्षणी मीनाक्षीने बाजी मारली. या पराभवामुळे विनेशचे एशियन गेम्स २०२६ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न संपुष्टात आले.
पराभवानंतरही विनेशने हार मानण्यास नकार दिला. तिने भावनिक प्रतिक्रिया देताना आपण पुन्हा मॅटवर पुनरागमन करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच काही वक्तव्यांमधून तिने भारतीय कुस्ती व्यवस्थेवर नाराजीही व्यक्त केली. मात्र या अपयशानंतरही ती पुन्हा तयारी करून पुनरागमन करेल, असा विश्वास तिच्या समर्थकांना आहे.
विनेश फोगट ही भारतातील सर्वात यशस्वी महिला कुस्तीपटूंमध्ये गणली जाते. राष्ट्रकुल स्पर्धा, आशियाई स्पर्धा आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धांमध्ये तिने अनेक पदके जिंकली आहेत. त्यामुळे तिच्या या पराभवाने चाहत्यांमध्ये निराशा पसरली असली, तरी तिच्या लढाऊ वृत्तीमुळे पुनरागमनाची आशा कायम आहे. सध्या मात्र एशियन गेम्स २०२६ मध्ये खेळण्याची संधी तिच्या हातातून निसटली असून भारतीय कुस्तीतील हा एक मोठा धक्का मानला जात आहे.







