इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये चाहत्यांच्या जल्लोषात भारतीय पुरुष आणि महिला संघांनी खो-खोच्या पहिल्या विश्वचषकाचे विजेतेपद पटकावून इतिहास घडवला. नेपाळला अंतिम सामन्यात पराभूत करत भारतीय संघांनी संपूर्ण देशाला अभिमानाचा क्षण मिळवून दिला व भारतीय पुरुष व महिला संघांनी प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या स्टेडियमवर भारताचे नाव विश्वचषकावर सुवर्णाक्षरात कोरले. भारतीय खो-खो संघांनी एक अनोखा आणि गौरवास्पद इतिहास रचला आहे. भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी खो-खोच्या पहिल्या विश्वचषकात संपूर्ण स्पर्धेत आपला दबदबा कायम ठेवत पहिले विश्वविजेतेपद पटकावले. महिलाच्या सामन्यात भारताने नेपाळवर ७८-४० असा ३८ गुणांनी विजय साकारला. तर पुरुष अंतिम सामन्यात भारताने नेपाळला ५४-३६ असा १८ गुणांनी पराभूत केले.
भारताच्या पुरुष संघाने सुरवातीपासूनच आक्रमक खेळ करताना नेपाळला जरा सुध्दा डोकं वर काढायला दिले नाही. पहिल्या टर्न मध्ये भारताने तब्बल चार तुकड्या बाद करून नेपाळला जोरदार धक्का दिला व या आक्रमणाच्या टर्नमध्ये भारताने २६-० असे गुण वसूल केले. दुसऱ्या टर्न मध्ये नेपाळच्या आक्रमणात भारताची पहिली तुकडी २.४४ मि. संरक्षण करू शकली तर दुसरी तुकडी १.५९ मिनिटात बाद झाली. तर तिसऱ्या तुकडीतील खेळाडूंनी २.०२ मि. वेळ देत बाद झाली तर चौथी तुकडी नाबाद राहिली त्यामुळे मध्यंतराला २६-१८ असा गुणफलक दिसत होता.
तिसऱ्या टर्न मध्ये आक्रमण करताना भारताने नेपाळची पहिली तुकडी १.४९ मि. बाद केली तर दुसरी तुकडी १.१० मि. तंबूत परतली. तर तिसरी तुकडी अवघ्या ४५ सेकंदात बाद केली. चौथ्या तुकडीला १.०७ मि. बाद केले. पाचव्या तुकडीतील दोन खेळाडू बाद झाले. यावेळी विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचा गुणफलक ५४-१८ असे गुण दर्शवत होता. चौथ्या व शेवटच्या टर्न मध्ये नेपाळने आक्रमणाला सुरवात केली व भारताची पहिली तुकडी दोन मिनिटात परतवण्यात नेपाळने यश मिळवले. तर दुसरी तुकडी २.१६ मि. बाद झाली तर तिसरी तुकडी २.०१ मि. बाद झाली तर चौथी तुकडी नाबाद राहिली व भारताने हा सामना ५४-३६ असा १८ गुणांनी जिंकत विश्वचषकाला कवटाळले.
महिलांमध्ये भारताची मुसंडी
महिलांच्या अंतिम सामन्यात पहिल्या टर्नमध्ये भारतीय संघाने आक्रमण करताना नेपाळची पहिली तुकडी ५० सेकंदात, दुसरी तुकडी १.४८ मि. तर तिसरी तुकडी १.२० मि. बाद केली व चौथी तुकडी १ मि. पाचवी तुकडी ४५ सेकंदात तर उरलेले दोन खेळाडू ३४ सेकंदाच्या आत बाद करत भारताच्या खेळाडूंनी ३४ गुण मिळवले या वेळी कर्णधार प्रियांका इंगळे, रेश्मा राठोड यांनी चमकदार खेळी केली.
दुसऱ्या टर्नमध्ये नेपाळच्या पहाडी मुलींनी कमालीचा खेळ करत भारताच्या ड्रीम रन गुणसंख्येला वेसन घातले. नेपाळने भारताची पहिली तुकडी तीन मि. नंतर बाद केल्याने भारताला एक ड्रीम रन चैतरा बी ने मिळवून दिला. दुसरी तुकडी १.३९ मि. बाद करण्यात नेपाळला यश मिळाले.
तिसऱ्या टर्नमध्ये भारताने आक्रमणात नेपाळची पहिली तुकडी १.४२ मि. बाद करून जोरदार प्रतिउत्तर दिले तर दुसरी तुकडी ३३ सेकंदात बाद झाली. तिसऱ्या तुकडीला १.०७ मि. बाद करत भारताने मोठ्या गुणसंख्येकडे वाटचाल सुरु केली. चौथी तुकडी ५० सेकंदात कापून काढली.
चौथ्या टर्न मध्ये नेपाळने आक्रमण केले पण ते आक्रमण परतवून लावताने भारताच्या पहिल्या तुकडीने ५.१४ मि. वेळ देत नेपाळला सामन्यात पुन्हा परतण्याची संधीच न देण्याची किमिया साधली व हा सामना भारताने ७८-४० असा ३८ गुणांनी जिंकला.
सामन्याचे पुरस्कार:
• सर्वोत्तम आक्रमक: अंशू कुमारी (भारतीय संघ)
• सर्वोत्तम संरक्षक : मनमती धानी (नेपाळ संघ)
• सामन्याची सर्वोत्कृष्ट खेळाडू: चैत्रा बी (भारतीय संघ)
स्पर्धेचे बक्षीस वितरण केंद्रीय मंत्री किरण रिजिजू , सुमित्रा महाजन (माजी लोकसभा अध्यक्षा) व विविध मान्यावरांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी खो खो महासंघाचे अध्यक्ष सुधांशू मित्तल व महासचिव महेंद्र सिंग त्यागी उपस्थित होते.
हे ही वाचा:
शेखर यादव यांच्या समान नागरी कायद्याबाबतच्या वक्तव्याविरोधात डावे एकवटले!
दिल्ली निवडणुकीनंतरच भाजपला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष!
आव्हाड भाऊ आरोपी मोहम्मद शहजाद आहे बरं!
सैफच्या हल्लेखोराने याआधीही त्याच्या घरी दिली होती भेट
सामन्याचे पुरस्कार:
* सर्वोत्तम आक्रमक: सुयश गरगटे (भारत)
* सर्वोत्तम संरक्षक : रोहित बर्मा (नेपाळ)
* सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू: मेहूल (भारत)
महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रत्येकी २.२५ कोटींचे बक्षीस
सर्व सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंना महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रत्येकी २ कोटी २५ लक्ष रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाणार आहे. तसेच थेट क्लास वन अधिकारी म्हणून नोकरी देखील राज्य शासनाच्या वतीने दिली जाणार आहे.
– चंद्रजीत जाधव, सह सचिव भारतीय खो खो महासंघ.
हा विजय आमच्या मेहनतीचे प्रतीक
हा विजय आमच्या मेहनतीचे प्रतीक आहे. संपूर्ण भारतासाठी हा एक सुवर्ण क्षण आहे. आजचा दिवस केवळ माझ्या काराकीर्दीतालाच नाही, तर भारतीय खो-खोच्या इतिहासातील सुवर्ण दिवस आहे. हा विजय आमच्या संघाच्या अथक मेहनतीचा, प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाचा आणि प्रत्येक भारतीयाच्या पाठिंब्याचा परिणाम आहे.
-प्रतीक वाईकर, पुरुष कर्णधार