उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ बाबत पुन्हा एकदा मोठं विधान केलं आहे. त्यांनी पाकिस्तानवरील भारताच्या कारवाईला ‘विकसित भारताची झलक’ म्हणत स्पष्ट केलं की, ‘विकसित भारत’ कुणालाही छेडत नाही, अनावश्यक हस्तक्षेप करत नाही, पण जर कोणी भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करत असेल, नागरिकांच्या सुरक्षेला धोका पोहोचवत असेल, तर ‘नवीन भारत’ त्याला सोडत नाही.
मुख्यमंत्री म्हणाले की, भारत शत्रूच्या मांदेत घुसून मारतो. आज संपूर्ण जगाने भारताच्या ताकदीचा अनुभव घेतला आहे आणि भविष्यातही जगाला त्याची जाणीव होईल. मुख्यमंत्री योगी लोकभवन सभागृहात उत्तर प्रदेश लोकसेवा आयोग, प्रयागराज मार्फत निवडलेल्या ४९४ सहाय्यक अध्यापक आणि ४९ प्रवक्त्यांना नियुक्ती पत्र देताना बोलत होते.
हेही वाचा..
‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तानचा शेअर बाजार ढासळला
सेनाप्रमुखांनी लान्स नायक दिनेश कुमार यांच्या शौर्याला दिली सलामी
पंजाबमधील फिरोजपूर सेक्टरमध्ये बीएसएफने पाकिस्तानी घुसखोराला केले ठार
“कसोटी सिंहासन रिकामं – गिल की बुमराह?”
यावेळी त्यांनी २३ शासकीय इंटर कॉलेजमध्ये मिनी स्टेडियमचा शिलान्यास केला. या स्टेडियमसाठी ४.९२ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. कार्यक्रमात ५ शासकीय माध्यमिक विद्यालयांना अटल टिंकरिंग लॅब आणि ५ विद्यालयांना आयसीटी लॅब स्थापनेसाठी प्रमाणपत्र देण्यात आले. आपल्या भाषणात सीएम योगींनी शिक्षकांना आवाहन केलं की, जग बदलत आहे, आपणही त्या बदलासोबत स्वतःला जुळवून घ्यायला हवं. जर आपण विद्यार्थ्यांना आजच्या युगाच्या गरजेनुसार तयार करू, तर आपली उपयुक्तता टिकून राहील. अन्यथा, आपल्यातील चूक केवळ सध्याची पिढी नव्हे, तर पुढची पिढीही माफ करणार नाही.
मुख्यमंत्र्यांनी शिक्षणात नवकल्पना, संशोधन व विकासाला प्रोत्साहन देण्याचं आवाहन केलं. त्यांनी सुचवलं की, शिक्षण उबाऊ न होता कथा-कथनाच्या माध्यमातून अधिक आकर्षक व्हावं. योगी म्हणाले की, ही निवड प्रक्रिया पारदर्शक आणि शिफारसविरहित होती. त्यांनी स्पष्ट केलं की, ज्या पारदर्शकतेने निवड झाली आहे, तसंच योगदान शिक्षणातही अपेक्षित आहे. ते पुढे म्हणाले की, सरकारी नोकरी मिळेपर्यंत व्यक्ती तक्रार करत असतो, पण नोकरी मिळाल्यावर जबाबदाऱ्या विसरतो. याचमुळे माध्यमिक शिक्षण मंडळाचं अस्तित्व धोक्यात आलं होतं. २०१७ पूर्वी शिक्षण ‘नकल’साठी कुप्रसिद्ध होतं. आता ‘ऑपरेशन कायाकल्प’सारख्या उपक्रमांमुळे आमूलाग्र बदल घडले आहेत.
मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या ८ वर्षात ८ लाखाहून अधिक युवकांना सरकारी नोकऱ्या दिल्या आहेत. माध्यमिक शिक्षण विभागात ४०,००० पेक्षा जास्त शिक्षक भरती करण्यात आले आहेत. बेसिक शिक्षण परिषदेतही १,२३,००० हून अधिक शिक्षक भरती करून शिक्षकांची कमतरता भरून काढण्यात आली आहे. ते म्हणाले की, हे सर्व आधीही शक्य होतं, पण राजकीय इच्छाशक्ती नव्हती. शिक्षण सरकारच्या अजेंड्यावरच नव्हतं. काही लोकांचं जीवनच देशाच्या बालपणाशी खेळण्याचं एक वेड झालं होतं.