१९९९च्या कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या जवानाच्या मुलाने देशातील अग्रगण्य इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये मिळत असलेला प्रवेश धुडकावून भारतीय लष्कर प्रशिक्षण संस्थेची निवड केली आहे. त्याबद्दल त्याचे कौतुक होत आहे.
प्रज्वल समृत असे या मुलाचे नाव असून तो नागपूरजवळील पुलगाव येथील रहिवासी आहे. प्रज्वलचा जन्म होण्याच्या ४५ दिवस आधीच त्याचे वडील लान्स नाईक कृष्णाजी समृत हे १९९९च्या कारगिल युद्धात हुतात्मा झाले होते. कृष्णाजी यांचा मोठा मुलगा कुणाल याने भारतीय सैन्यदलात अधिकारी व्हावे, अशी इच्छा होती. मात्र त्याने इंजिनीअरिंगचे क्षेत्र निवडले. प्रज्वलने मात्र त्यांच्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचे मनावर घेतले.
प्रज्वल जूनच्या सुरुवातीला डेहराडून येथील प्रतिष्ठित इंडियन मिलिटरी अकादमी (IMA) मध्ये कॅडेट म्हणून सहभागी होणार आहे. अर्थात २३ वर्षीय प्रज्वलसाठी हे सोपे नव्हते. ‘हा माझा शेवटचा प्रयत्न होता. मात्र हे नाही झाले तर दुसऱ्या पर्यायाचीही मी तयारी केली होती. त्यामुळे कॅट परीक्षा उत्तीर्ण झालो. या महिन्यात आयआयएम इंदूर आणि कोझिकोडमधून प्रवेशाचे प्रस्ताव आले होते,’ असे प्रज्वलने सांगितले. प्रज्वलची आई सविता समृत (५२) यांनीही त्यांचा एक मुलगा पतीचे स्वप्न पूर्ण करतोय, याबाबत आनंद व्यक्त केला आहे. “कुणाल हे करू शकला नाही. प्रज्वलने मात्र ते केले. मला खूप अभिमान वाटतो,’ असे त्या म्हणाल्या.
सविता या पुलगावच्या आर्मी हॉस्पिटलमध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर आहेत. सन १९९१मध्ये त्यांचा कृष्णाजी यांच्याशी विवाह झाला होता. कृष्णाजी कारगिलला रवाना होण्यापूर्वी ते दोघे त्रिवेंद्रम, बेळगाव आणि कोलकाता येथे राहिले. कृष्णाजींच्या आई-वडिलांचे निधन झाल्याने सविता त्यांच्या आईवडिलांच्या घराजवळच पुलगाव येथे स्थायिक झाल्या. ‘माझे वडील नेमके केव्हा हुतात्मा झाले, याची नेमकी तारीख आम्हाला माहीत नाही, पण आम्ही त्यांची पुण्यतिथी ३० जुलै रोजी पाळतो,’ असे प्रज्वल म्हणाला.
हे ही वाचा:
पित्याने आपल्या दोन लेकींसाठी बिबळ्याच्या जबड्यात हात घातला
भुयारी मार्गात तुंबलेल्या पाण्यात गाडी अडकली; इन्फोसिसच्या इंजीनियरचा मृत्यू
ने मजसी ने, जयोस्तुते या कविता अभ्यासक्रमात समाविष्ट व्हाव्यात!
दोन हजाराच्या नोटा बदलण्यासाठी फॉर्म, ओळखपत्राची गरज नाही
प्रज्वलने सन २०१८मध्ये बारावीनंतर एनडीएची तयारी करून पाहिली होती. नागरी सेवा मंडळाची परीक्षा त्याने उत्तीर्ण केली होती. परंतु वैद्यकीय चाचणीमध्ये तो अपयशी ठरला. ‘मी सातवेळा मुलाखतीपर्यंत पोहोचलो. परंतु प्रत्येक वेळी अपयशी ठरलो,’ असे प्रज्वल म्हणाला. त्याच्या आठ अयशस्वी प्रयत्नानंतर, शेजारी नितीन कोठे यांनी त्याला शेवटचा प्रयत्न करण्याची गळ घातली आणि ती पूर्ण झाली. ‘अनेकांनी त्यांना लष्कराच्या जीवनातील धोक्यांचा इशारा दिला होता. पण प्रज्वलचा निर्धार कायम होता. त्याने आपले आयएमएचे लक्ष्य तसूभरही ढळू दिले नाही,’ असे कोठे म्हणाले.