आजकाल बिबट्यांची दहशत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात दिसू लागली आहे. अहिल्यानगरमध्ये अशाच एका नरभक्षक बिबट्याने लोकांमध्ये घबराट निर्माण केली होती. त्याने दोन व्यक्तींना मारल्यामुळे या बिबट्याला तात्काळ ठार मारा अशी लोकांची मागणी होती. घराबाहेर पडणेही लोकांना मुश्कील झाले होते. पण अखेर त्या बिबट्याला मारण्यात यश आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून या बिबट्याने अहिल्यानगरात धुमाकूळ घातला होता. पण वनविभागाने त्याला शेवटी मारण्यात यश मिळविले. या बिबट्याने दोन जणांचा बळी घेतला होता, तर अनेकांवर हल्ले करून परिसरात दहशत निर्माण केली होती. यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली होती. बिबट्याला ठार मारल्यामुळे मात्र आता परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
कोपरगाव तालुक्यातील टाकळी शिवारातील ऊसतोड कामगाराच्या मुलीवर आणि येसगाव येथील वृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला करून त्यांचा बळी घेतला होता. तसेच शिंगणापूरमध्ये एका मुलाला गंभीर जखमी केले होते. बिबट्याने माणसांवर हल्ले करण्याबरोबरच शेळ्या, गाईगुरे यांच्यावरही हल्ले केले. यानंतर प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली होती. तेव्हा वनअधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.
हे ही वाचा:
क्रिएटिविटी ही भारताच्या विकास यात्रेची प्रमुख शक्ती
इमारतीच्या खोदकामातून काढलेली माती अंगावर कोसळली
चमत्कारी झाडावर लागतात चार प्रकारचे आंबे
ग्रेटर बांगला देश हे हसीना यांचेही खानदानी स्वप्न; एसआयआरला विरोध का होतोय?
तब्बल १०० लोक वनविभागातर्फे या मोहिमेत सहभागी झाले होते. टाकळी, येसगाव, ब्राह्मणगाव परिसरात बिबट्याला धरण्य़ासाठी १५ पिंजरे लावण्यात आले होते. नाशिक आणि पुणे येथून विशेष पथके बोलावण्यात आली होती. दोन शार्प शूटर्स आणि तीन ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करून शोधमोहीम करण्यात आली. नागपूर येथील प्रिन्सिपल चीफ कंजर्व्हेटर ऑफ फॉरेस्ट यांनी बिबट्याला पकडण्यासाठी व गरज भासल्यास ठार करण्याची परवानगी दिली होती.
दरम्यान, नांदेडच्या वडेपुरी शिवारात काही दिवसांपूर्वी बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यानंतर पुन्हा बिबट्या दिसल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केलाय. त्यामुळे या भागात आता बिबट्याची दहशत पसरली आहे.







