दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनादरम्यान रॅपिड ऍक्शन फोर्स (RAF) च्या कारवाईवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) महासंचालक ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांनी जवानांना ठाम पाठिंबा दिला आहे. “कर्तव्य बजावताना कोणतीही भीती बाळगू नका. प्रामाणिकपणे (बोना फाईड) घेतलेल्या प्रत्येक निर्णयाची जबाबदारी आणि उत्तरदायित्व मी स्वीकारेन,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
दिल्लीतील आंदोलनादरम्यान सुरक्षा दलांनी पेलेट गनचा वापर केल्याचा आरोप होत असून, या प्रकरणावरून राजकीय आणि सामाजिक स्तरावर मोठा वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर CRPF प्रमुखांनी अधिकाऱ्यांशी आणि जवानांशी संवाद साधताना कर्तव्य पार पाडताना कायदेशीर आणि प्रामाणिक हेतूने घेतलेल्या निर्णयांबाबत कोणालाही घाबरण्याची गरज नसल्याचे सांगितले.
ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांनी स्पष्ट केले की, सुरक्षा दलांचे जवान अत्यंत तणावपूर्ण आणि आव्हानात्मक परिस्थितीत काम करतात. अशा वेळी त्यांनी कर्तव्याच्या चौकटीत राहून घेतलेल्या निर्णयांवर वरिष्ठ अधिकारी म्हणून आपण ठामपणे उभे राहू, असे आश्वासन त्यांनी दिले. यामुळे जवानांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.
हे ही वाचा:
ऐतिहासिक बॉर्डर-गावस्कर विजयाचा शिल्पकार अजिंक्य रहाणे निवृत्त
पौराणिक महाकाव्याचा भव्य अविष्कार; ‘रामायण’चा ट्रेलर प्रदर्शित
ऍपल वॉच ठरलं ‘लाईफगार्ड’; मालक बेशुद्ध होताच स्वतःहून केला ९११ ला फोन
‘पाकिस्तानी काश्मीर’ नव्हे, पाकिस्तानव्याप्त काश्मीर!
दरम्यान, CRPF ने यापूर्वीच जंतर-मंतर आंदोलनादरम्यान RAF च्या कारवाईचा ‘व्यावसायिक पोस्ट-इव्हेंट आढावा’ (Professional Post-Event Assessment) घेण्याची घोषणा केली आहे. या प्रक्रियेत संपूर्ण कारवाईचे परीक्षण करून भविष्यातील कार्यपद्धतीबाबत आवश्यक सुधारणा सुचवल्या जाणार आहेत. २० जुलै रोजी संसद मार्चदरम्यान आंदोलनकर्ते आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या संघर्षात अनेक आंदोलक जखमी झाल्याचा दावा करण्यात आला होता. काही आंदोलकांच्या शरीरातून धातूचे कण काढण्यात आल्याचे वैद्यकीय अहवाल समोर आल्यानंतर पेलेट गन वापरल्याचा वाद अधिक तीव्र झाला आहे. मात्र, या प्रकरणात नेमकी कोणती गर्दी नियंत्रण साधने वापरण्यात आली, याबाबत चौकशी आणि विविध स्तरांवरील परीक्षण अद्याप सुरू आहे.







