राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची क्षमता वाढविणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ज्या बंदराकडे पाहिले जाते त्या पालघरच्या वाढवण बंदराचे तसेच जवाहरलाल नेहरू पोर्टचे कार्याध्यक्ष आयआरएस उन्मेष शरद वाघ यांची प्रसिद्ध उद्योगपती व पालघरचे सुपुत्र प्रशांत कारुळकर यांनी भेट घेऊन चर्चा केली.
गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या वाढवण बंदराच्या प्रकल्पाचा भव्य पायाभरणी सोहळा पालघर जिल्ह्यात पार पडला. या बंदरामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा एक वेगळा दबदबा निर्माण होणार आहे. कारण मध्य आशिया आणि रशिया यांना आंतरराष्ट्रीय उत्तर दक्षिण कॉरिडोरच्या माध्यमातून हे बंदर जोडणार आहे तसेच भारत आणि मध्य पूर्व – युरोप यांनाही हे बंदर जवळ आणणार आहे. या बंदरामुळे जवाहरलाल नेहरू पोर्टचा भार बराचसा कमी होईल. ७६ हजार कोटींची गुंतवणूक या बंदरासाठी करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर भारतीय सेनेच्या सन्मानार्थ महायुतीची भव्य तिरंगा यात्रा!
छोट्या ड्रोनना शोधून टिपणारे ‘भार्गवस्त्र’ भारताच्या भात्यात
काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षेपेक्षा स्वार्थ महत्त्वाचा
या बंदराची तसेच जवाहरलाल नेहरू पोर्टची जबाबदारी आता या प्राधिकरणाचे कार्याध्यक्ष असलेले कर्तव्यदक्ष अधिकारी उन्मेष शरद वाघ यांच्याकडे आहे. या बंदराच्या निर्मितीची प्रक्रिया वाघ यांच्या देखरेखीखाली सुरू आहे. उन्मेष वाघ हे २००१च्या बॅचचे आयआरएस अधिकारी असून त्यांनी जळगाव येथून सेंट्रल एक्साईज आणि कस्टम्सचे सहआयुक्त म्हणून आपल्या सेवेस प्रारंभ केला. आता उन्मेष वाघ यांच्या रूपात एक मराठी माणूस वाढवण बंदराच्या या महत्त्वाच्या पदावर आहे, त्यामुळे या बंदराच्या प्रगतीकडे सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
प्रशांत कारुळकर यांनी या भेटीदरम्यान या बंदराच्या माध्यमातून पालघरच्या स्थानिक मराठी युवकांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढवण बंदरामुळे देशाचे नाव उज्ज्वल होणार असताना पालघरसारख्या जिल्ह्याचीही चमक वाढेल, या जिल्ह्याचाही विकास होईल, अशी अपेक्षाही कारुळकर यांनी व्यक्त केली.
प्रशांत कारुळकर यांनी यावेळी आपले पुत्र विवान कारुळकर याचे द सनातन धर्म : ट्रू सोर्स ऑफ ऑल सायन्सेस आणि द सनातन धर्म : ट्रू सोर्सेस ऑफ ऑल टेक्नॉलॉजीस ही पुस्तके उन्मेष वाघ यांना प्रदान केली. उन्मेष वाघ यांनी या पुस्तकांबद्दल विवानचे कौतुक केले आणि त्याचे अभिनंदनही केले. हे पुस्तक इंग्रजी, मराठी, हिंदी भाषेत आली असून देशविदेशात त्या पुस्तकाला मोठा प्रतिसाद लाभला आहे.
