भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला असून भारतीय सेना सातत्याने पाकिस्तानला कठोर प्रत्युत्तर देत आहे. अशा परिस्थितीत राजस्थानमधील जैसलमेर येथे तीव्र स्फोटांचे आवाज ऐकायला मिळाले. याचप्रमाणे कांगडामधील डमटाल परिसरातही क्षेपणास्त्राचे तुकडे पडल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जैसलमेरजवळील पोखरण भागात अनेक स्फोटांचे आवाज ऐकले गेले. हे स्फोट ड्रोन किंवा लहान क्षेपणास्त्रांचे असू शकतात, जे भारतीय एअर डिफेन्स सिस्टीमने पाडले असावेत. आशंका आहे की जैसलमेरला लक्ष्य करण्यात आले होते.
सध्या पोखरणजवळील गाव रिकामे करण्यात आले आहेत. दुसरीकडे, पठाणकोटलगतच्या कांगडामधील डमटाल भागात एका क्षेपणास्त्राचे अवशेष पडल्याची माहिती समोर आली आहे. कांगडाचे डीसीपी संजीव कुमार घटनास्थळी पोहोचले असून परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही मोठी हानी झालेली नाही.
हेही वाचा..
ऑपरेशन सिंदूर : पाकिस्तानमधील टॉप-५ दहशतवाद्यांचा खात्मा
भारताच्या प्रत्युत्तर हल्ल्यांनी पाक बिथरला! परराष्ट्र मंत्री म्हणतात, तणाव कमी व्हावा
पाकिस्तानला नापाक कृत्यांचा फटका बसणारच
त्याआधी, संरक्षण मंत्रालयाने आपल्या ‘एक्स’ हँडलवर जम्मूमधील प्रसिद्ध शंभू मंदिर आणि रहिवासी भागाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. त्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी हल्ल्यात शंभू मंदिर आणि परिसराला किती नुकसान झाले आहे, हे स्पष्टपणे दिसत आहे. पाकिस्तानकडून होणाऱ्या ड्रोन हल्ल्यांच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर राजस्थानमधील जैसलमेर आणि बाडमेर या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. स्थानिक प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांनी परिस्थिती लक्षात घेता सतर्कता उपाययोजना केल्या असून दोन्ही जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
जैसलमेरमध्ये शनिवारी दुपारी अचानक सर्व बाजारपेठा, दुकाने, हॉटेल्स आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना घरीच राहण्याचे आणि सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री कार्यालयात राज्य मंत्रिमंडळाची आपत्कालीन बैठक घेतली होती. त्यांनी प्रभारी मंत्र्यांना, स्थानिक प्रतिनिधींना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या भागात सतत संपर्कात राहण्याचे व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. तसेच, राज्याची लांब आंतरराष्ट्रीय सीमा लक्षात घेता नागरिकांनी जबाबदारीने वागावे, अफवांपासून दूर राहावे आणि केवळ अधिकृत व सत्यापित माहितीवर विश्वास ठेवावा, असेही आवाहन केले.