स्वरा भास्कर ही अभिनेत्री वादग्रस्त विधानांबद्दल ओळखली जाते. तिने छावा चित्रपटाच्या निमित्ताने ट्विट करत ५०० वर्षांपूर्वी हिंदूंवर जे तथाकथित अत्याचार झाले त्याचे चित्रण करण्यापेक्षा महाकुंभमध्ये जी अव्यवस्था झाली, चेंगराचेंगरी झाली त्याचा विचार आधी करायला हवा असे वादग्रस्त मत मांडले होते. पण आपले हे विधान चुकीच्या अर्थाने घेतले गेले असे म्हणत तिने आता माफी मागितली आहे.
स्वरा भास्करने म्हटले आहे की, माझ्या त्या पोस्टमुळे खूप चर्चा झाली आणि त्यातून अनेक गैरसमज पसरले. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल आदर बाळगते, त्यांच्या योगदानाबद्दल मला अभिमान आहे. शिवाय, त्यांच्या सामाजिक न्याय आणि महिलांबद्दलच्या त्यांच्या भूमिकेबद्दलही मला आदर वाटतो. माझे म्हणणे एवढेच होते की, इतिहासाचे उदात्तीकरण ठीक आहे पण वर्तमान काळात झालेल्या चुका लपविण्यासाठी त्या इतिहासाचा उपयोग होता कामा नये.
हे ही वाचा:
झारखंडमध्ये १९ हजार एकर अफूची शेती नष्ट
उत्तर प्रदेशातील ९०,००० कैद्यांनी केले पवित्र स्नान!
संभल हिंसाचार : १२ पैकी ६ प्रकरणात आरोपपत्र दाखल
राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांना जीवे मारण्याची धमकी
माझ्या आधीच्या पोस्टमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. प्रत्येक भारतीय व्यक्तीप्रमाणे मला इतिहासाचा अभिमान आहे. आपल्या इतिहासामुळे आपली एकजूट व्हायला हवी. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या संघर्ष करण्याची ताकद आपल्याला इतिहासातून मिळायला हवी.
छावा चित्रपटाने सध्या देशभरात जबरदस्त यश मिळविले आहे. छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने ज्या निर्घृण पद्धतीने मारले त्यातून लोकांच्या मनात मुघलांबद्दल संताप अनावर झाला आहे. त्यावरून स्वरा भास्करने एक्सवर पोस्ट करत महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी व अव्यवस्थेकडे लक्ष द्या, इतिहासात डोकावण्याची आता काय गरज असे अनाहूत सल्ले देण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर लोकांनी संताप व्यक्त केला होता. त्यामुळे अखेर स्वरा भास्करला उपरती झाली.