राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकाराने ठाण्यात महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे प्रति मंदीर उभारण्यात आले आहे. आज (३० एप्रिल) अक्षय्य तृतीयेचा मृहूर्त साधत या तुळजाभवानी मंदिरात प्राणप्रतिष्ठापनाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला शरद पवार आणि प्रतिभाताई पवार यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, राज्याचा प्रमुख असताना मी चार ते पाच वेळेला महाराष्ट्राच्या भल्यासाठी पंढरपूरला पांडुरंगाची पूजा केलेली होती. तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरातही मी अनेकदा महापूजा केलेली आहे. काही लोक म्हणतात की, मी अशा कार्यक्रमांना जात नाही. पण ते अर्धसत्य आहे. आपल्या अंत:करणातील श्रद्धेचं कधीही प्रदर्शन करू नये. मात्र, आपण आता पवित्र स्थानी आहोत, त्यामुळे राजकारणावर भाष्य करायला नको, असे देखील शरद पवारांनी म्हटले.
पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यावरही त्यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, पहलगामवरचा हल्ला हा देशावरचा हल्ला आहे. या हल्ल्यात ज्यांचे कुटुंबीय शहीद झाले आहेत, त्यांनी या देशासाठी किंमत दिलीय. त्यामुळे आता धर्म, जात-पात आणि भाषा या गोष्टी कोणीही आणायच्या नाहीत. आज भारतीयांवर कुठल्या शक्तींचा हल्ला होत असेल, तर देशवासिय म्हणून कशाचीही अपेक्षा न करता आपल्याला एकत्र यावं लागेल. देशाचे पंतप्रधान आणि अन्य सहकारी याबाबत जी काही उपाययोजना करत असतील त्याला आमचे पूर्ण सहकार्य आहे.
हे ही वाचा :
मोठा निर्णय : राष्ट्रीय जनगणनेत होणार जातीय नोंदणी
पंतप्रधान मोदी रशिया दौऱ्यावर जाणार नाहीत!
जगाला माहिती आहे पाकिस्तान काय आहे
देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या चिन्मय दास यांना जामीन मंजूर!
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, देशाचे प्रधानमंत्री आणि अन्य सहकारी यासंबंधीची उपाययोजना करत आहेत. त्याला पूर्ण सहकार्य आम्हा सर्वांचे आहे. त्या संबंधीचेच वक्तव्य आम्ही सर्वपक्षीय नेत्यांनी केलेले आहे. सर्व पक्ष बैठकीमध्ये आमच्या प्रतिनिधींनी देखील तशीच भूमिका घेतली आहे. त्याच भूमिकेवर आम्ही पुढे जाणार असल्याच शरद पवार यांनी म्हटले. विशेष अधिवेशन घेण्याची मागणी आमच्या काही सहकाऱ्यांनी केली आहे. या प्रश्नावर सर्व देश एक आहे, सर्व पक्ष एकत्र आहेत, सर्व नेते एक आहेत, हा संदेश सर्वत्र पाठवण्यासाठी अधिवेशन उपयुक्त ठरेल, असे शरद पवार म्हणाले.