होळी-धुलीवंदनाच्या दिवशी वरळीतील कोळीवाड्यांमध्ये लाऊड स्पीकर डीजेला बंदी घालण्यात आली आहे. ध्वनी प्रदूषणाचे कारण देत प्रशासनकडून बंदीचे आदेश देण्यात आले आहेत. काही ठिकाणी नोटीस देण्यात आल्या आहेत तर काही ठिकाणी तोंडी सूचना दिल्या आहेत. जर आदेशाचे पालन न केल्यास कडक कारवाईच्या सूचना देखील पोलीस प्रशासनकडून देण्यात आल्या आहेत. दरम्यान, या निर्णयावर उबाठाचे नेते आदित्य ठाकरेंनी महायुती सरकारवर टीका केली होती. ‘चुनावी हिंदुत्व राबवायचं आणि सत्तेत आल्यावर मात्र मराठी सणांवर बंधन घालायची’, ही कसली नीती?, असा सवाल करत त्यांनी सरकारवर टीका केली होती. आदित्य ठाकरेंच्या या टीकेला भाजपा नेते राम कदम यांनी प्रत्युतर देत उबाठावर निशाना साधला. हिंदुत्व सोडले म्हणून लोकांनी नाकारले, म्हणून आता हिंदू सण त्यांना आठवले, आदित्य ठाकरेंचा हा तर खोटारडेपणा, असे राम कदम म्हणाले आहेत.
राम कदम म्हणाले, हिंदुत्व सोडले म्हणून ज्या उबाठाला विधानसभेच्या निवडणुकीत जोरदार चपराक मिळाली, त्या उबाठाला आता हिंदू सण आठवले. सत्तेच्या काळात वासुलीबाज आणि कोरोनाच्या काळात खिचडीचोर अशी प्रतिमा तुमची. वाईनशॉप आणि बिअर बार आधी उघडले. आम्ही रस्त्यांवर आंदोलन केली तरी देखील मंदिरांना टाळे लावणारे तुम्ही आणि आम्हाला सांगता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे हे सरकार आहे, आमच्या सरकारमध्ये कोणत्याही सणाला उत्सवाला बंदी नाही. आणि कोणी तसे खटाटोप करत असेल तर त्या अधिकाऱ्यांना देखील सरकार माफ करणार नाही. पण तुमचे उरेल-सुरलेले आमदार आणि खासदार तुम्ही हिंदुत्व सोडले म्हणून तुम्हाला सोडून जातील आणि खऱ्या शिवसेनेकडे वळतील. म्हणून अशा प्रकारचे उपदव्याप युवराज करतायेत, असे राम कदम म्हणाले.
हे ही वाचा :
‘केबीसी’च्या १७ व्या सीझनचे पुन्हा होस्ट असतील अमिताभ बच्चन
‘शाहिद आफ्रिदी धर्म बदलण्यास सांगत असे, भेदभावामुळेच कारकीर्द संपली!
जाफर एक्सप्रेस हायजॅक : विरोधकांच्या टीकेवर पाकिस्तान सरकार गप्प
दरम्यान, आदित्य ठाकरेंनी सरकारवर टीका करताना म्हटले होते, महाराष्ट्र सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? आधीच आमच्या गणेश मंडळांना विविध नियमांमध्ये अडकवून आणि विसर्जनाचा प्रश्न प्रलंबित ठेवून छळलं जातंय… आणि आता कोळीबांधवांसाठीच नाही तर सर्व हिंदू धर्मीयांसाठी महत्वाच्या असलेल्या होळी सणाच्या वेळी ‘माईक आणि लाऊडस्पिकरचे नियम’ दाखवून माझ्या वरळी मतदारसंघातल्या कोळीवाड्यातल्या उत्सवावर विरजण घालण्याचं काम सुरु आहे… ह्या सरकारला मराठी माणसांच्या सणांविषयी इतका आकस का आहे? ‘चुनावी हिंदुत्व राबवायचं आणि सत्तेत आल्यावर मात्र मराठी सणांवर बंधन घालायची’, ही कसली निती?