मंगळवारचा दिवस हा अपघातवार ठरला असून बुलढाण्यात ट्रक बसमध्ये झालेल्या अपघातात ८ जण दगावले असताना अमरावतीतही अशी दुर्घटना घडली. त्यात लग्न समारंभाहून परतणाऱ्या टेम्पोला ट्रकची धडक बसली आणि त्यात पाच जण मृत्युमुखी पडले.
अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी ते दर्यापूर मार्गावरील इटकी फाट्याजवळ सोमवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मृतकांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश असून हे सर्वजण अमरावती येथून लग्न समारंभ आटोपून परतत होते. दरम्यान अपघातात ६ जण जखमी झाले असून त्यांच्यावर अमरावतीतील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहे.
हे ही वाचा:
बुलढाण्यानजीक एसटी बस-ट्रकच्या धडकेत ८ मृत्यू
‘त्र्यंबकेश्वर मंदिरात धूप दाखविण्याची परंपराच नाही’
मोदींच्या पाया पडले पवारांना मागे हटवले…
दर्यापूर येथील एकाच कुटुंबातील १२ जण लग्न कार्यासाठी अंजनगाव सूर्जी येथे गेले होते. लग्न कार्य (वलीमा) आटोपून ते दर्यापूरकडे परत येत असताना इटकी फाट्याजवळ विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या वाहनालाल जोरदार धडक दिली. या धडकेत तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दरम्यान सर्व जखमींना तातडीने दर्यापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र जखमींची प्रकृती गंभीर असल्यामुळे दर्यापूरवरून ९ जणांना अमरावती पाठविण्यात आले.
जखमींना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी एका अडीच वर्षाच्या चिमुकलीसह दोघांना मृत घोषित केले. त्याचवेळी उर्वरित ६ जखमींवर सध्या शहरातील पीडीएमसी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात झाल्याची माहिती मिळतात खल्लार पोलिसांसह ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतक व जखमी एकाच कुटुंबातील असल्याची माहिती पोलिसीं दिली.