केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची काल पत्रकार परिषद झाली. पहलगाम हल्ल्यानंतर देशात ज्या प्रकारचे वातावरण निर्माण झाले आहे ते पाहाता, ते याच संदर्भात काही बोलतील, एखादी महत्वपूर्ण घोषणा करतील अशी अपेक्षा होती. कारण पाकिस्तानचा आचरट रेल्वे मंत्री मोहम्मद हनीफ अब्बासी याने आमच्याकडे असलेली अण्वस्त्र चौकात शोभेसाठी ठेवण्याकरीता नाहीत, असे विधान केले होते. त्यामुळे त्यांच्या रेल मंत्र्याला आमचे रेल मंत्री उत्तर देणार असा काही प्रकार, असण्याची शक्यता वाटत होती. परंतु सुदैवाने भारताकडून अशा अपरीपक्वपणाचे दर्शन झाले नाही. वैष्णव यांनी केवळ मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या जातीगत जनगणनेच्या निर्णयाची माहिती दिली.
या पत्रकार परिषदेच्या काही तास आधी पहाटे २ वाजता पाकिस्तानचा माहिती प्रसारण मंत्री अताउल्लाह तरार याने एक पत्रकार परिषद घेतली होती. या दोन पत्रकार परिषदांची तऱ्हा वेगळी असली तरी त्यांची तुलना होणे अपरिहार्य होते. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला खणखणीत इशारा पाकिस्तानमध्ये खळबळ निर्माण करणारा ठरला. ही खळबळ अद्यापि थांबलेली नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ मुळव्याध
बळावल्यामुळे ते हॉस्पिटलमध्ये दाखल झालेत. या तंट्याची काडी शिलगावणारा लष्कर प्रमुख मौलाना आसिफ मुनीर कुठल्या तरी बिळात लपला आहे.
पाकिस्तानी लष्कराची झोप उडालेली आहे. भारताचा हल्ला कधीही होईल या भीतीने त्यांचा टायर पंक्चर झालाय. पाकिस्तानी लष्करात वरपासून खालपर्यंत राजीनाम्याचे सत्र सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भारतातला माहोल पूर्णपणे तणावमुक्त आहे. जो काही तणाव आहे, तो शेअऱ बाजारापुरता मर्यादित आहे. राजकीय नेते पाकिस्तानवर मोठ्या
कारवाईची फिल्डींग लावण्यात गुंतले आहेत. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री डॉ.एस.जयशंकर, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा समावेश आहे. लष्कराचे तमाम सेनापती रणनीती ठरवण्याच्या कामाला लागले आहेत. परंतु राजकीय नेत्यांच्या दिनचर्येत फारसा फरक पडल्याचे दिसत नाही. अश्विनी वैष्णव यांनी त्याचे संकेत दिलेले आहेत.
कालच्या पत्रकार परिषदेत जातीय जनगणनेचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय त्यांनी देशासमोर ठेवला. काँग्रेसने त्यांच्या सत्ताकाळात जातीय जनगणनेला विरोध केला, विरोधी बाकांवर असताना या विषयाचे राजकारण केले, हे वैष्णव
यांनी ठणकावून सांगितले. या पत्रकार परिषदेचे टायमिंग समजून घ्या. बिहार निवडणुकांच्या आधी हा निर्णय घेऊन केंद्र सरकारने काँग्रेसच्या हातून एक मुद्दा काढून घेतला. हा मुद्दा जर नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या बिहार निवडणुकांमध्ये राहुल
गांधी यांना वाजवता येणार नाही. केंद्र सरकारने याचे श्रेय घेतलेले आहे. या निर्णयाचा राजकीय लाभ आपल्याच पदरात पडेल याची सोय केलेली आहे.
हे ही वाचा:
हाफिझ सईदसाठी पाकिस्तान एकवटला, दिली चार पट सुरक्षा!
बीएसएफने दहशतवादी कटकारस्थान उधळलं
पहलगाममध्ये एनआयएचे डीजी सदानंद दाते दाखल
ही एक वेब संस्कृती, सर्जनशीलतेची
‘मोदींनी राहुल गांधी यांच्या भूमिकेसमोर गुडघे टेकले’, ‘सरकार मोदींचं सिस्टीम राहुल गांधींची’ अशी टिप्पणी उबाठा सेनेचे वाचाळवीर संजय राऊत यांनी केली आहे. शक्य असेल तेव्हा तेव्हा राहुल गांधी यांची चरणवंदना ही राऊत आणि
त्यांच्या राजकीय मालकाची मजबूरी आहे. सतत चण्याच्या झाडावर चढवणारी ही गुलामांची जमातच राहुल गांधींना अशा दलदलीत बुडवते आहे, जिथून बाहेर येणे त्यांना कधी शक्य होईलसे दिसत नाही. जातीय जनगणनेचा खुळखुळा मोदी सरकारने हातातून काढून घेतल्यानंतर राहुल गांधी आता वाजवणार काय हा प्रश्न त्यांच्या राजकीय सल्लागारांसमोर
निश्चितपणे निर्माण झालेला आहे.
आमच्याच मुळे हे घडले, असे सांगत नाचण्याची संधीही मोदी देणार नाहीत, कारण पाकिस्तानवरील हल्ल्याचा मुहूर्त अनिश्चित असला तरी तो फार दूरचा नाही, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. देशाच्या राजकारणावर हुकूमत करणारे जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी यांच्यासारखे नेते राजकारणाच्या आंतरराष्ट्रीय सारीपाटावर मात्र उताणी पडले. साफ अपयशी ठरले. काँग्रेसच्या सत्ताकाळात झालेली तीन युद्ध याची उदाहरणे आहेत. युद्धात जवानांची रक्त सांडून जे कमावले ते वाटाघाटीच्या टेबलवर या दोन्ही नेत्यांनी गमावले. मोदींनी मात्र देशाचे राजकारण ज्या ताकदीने केले, तेवढीच पकड त्यांनी परराष्ट्र धोरणावर ठेवली. अविकसित, विकसनशील किंवा विकसित अशा कोणत्याही गटात मोडणारा देश असो तो आज मोदींचे गुणगान करतोय, या संकट समयी भारताच्या पाठिशी ठामपणे उभा राहिलेला दिसतोय.
सध्या जो घटनाक्रम सुरू आहे, ती अग्निपरीक्षा संपल्यानंतर हे राजकारण मोदींनी किती यशस्वीपणे पुढे नेले याचा सज्जड पुरावाच मिळणार आहे. पाकिस्तान हल्ल्याची वाट पाहात असताना मोदींचा मंत्रिमंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या एका ऐतिहासिक निर्णयाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतो, मोदी आज मुंबईत आले, त्यांनी वेव्हज समिटचे (वर्ल्ड ऑडीयो व्हीज्युअल एण्ड एण्टरटेनमेंट समिट) उद्घाटन केले. जगातील ९० देशांचे दहा हजार प्रतिनिधी, जगभरातील ३०० कंपन्या या समिटमध्ये सहभागी झाल्याचे चित्र सीमेच्या एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला पाकिस्तानने आपले हवाई क्षेत्र बंद केलेले आहे. त्यांच्या देशात आंदोलन हाच एक उपक्रम सुरू असून बाकी सगळे ठप्प झालेले आहे. देशातील उद्योगपती, राजकारणी, लष्करशहांचे परिवार देशातील पैसा बाहेर काढण्यात मग्न आहेत, असे चित्र असताना दुसऱ्या बाजूला नेते आपली दैनंदिन कामे शांतपणे पार पाडताना दिसतायत.
दहशतवाद्यांना आणि त्यांच्या आश्रयदात्यांना जगाच्या शेवटच्या टोकावरून खेचून आणू, असा दम मोदींनी दिला आणि त्यानंतर पाकिस्तानचा लष्कर प्रमुख आसीफ मुनीर गायब झाला आहे. मोदी मात्र आत्मविश्वासाने देशात फिरतायत.
कार्यक्रमांमध्ये सहभागी होतायत. २९ एप्रिलच्या पहाटे दोन वाजता पाकिस्तानचे माहिती प्रसारण मंत्री अताउल्ला
तरार याने पत्रकार परिषद घेतली. येत्या २४ ते ३६ तासांत भारत कधीही पाकिस्तानवर आक्रमण करू शकेल अशी अत्यंत शिळी झालेली ब्रेकींग न्यूज त्याने काही तरी मोठी घोषणा किंवा माहिती ऐकायला मिळेल या आशेने जमलेल्या पत्रकारांना ऐकवली. तरारची शारीर भाषा, त्याची आणि हादरलेल्या पाकिस्तानची मानसिकता स्पष्ट करत होती. जे एका ट्वीटवर सांगता आले, असते त्यासाठी त्याने पाकिस्तानी पत्रकार आणि अवघ्या पाकिस्तानची झोपमोड केली. त्याने जे काही सांगितले ते ऐकल्यानंतर पत्रकारांना प्रश्न पडला, की हे सांगायला पहाटे २ वाजताच्या मुहूर्ताची काय गरज होती, हे सकाळी सुद्धा
सांगता आले असते.
तरार यांची इतकी तंतरली आहे, त्याचे कारण स्पष्ट आहे. आसीफ मुनीरची तंतरलेली आहे. तो करून गायब झाला, भोगतायत शहबाज शरीफ, ख्वाजा आसीफ आणि तरार सारखे लोक. अणुबॉम्बची धमकी देऊन मोदींना थंड करता
येणार नाही याची जाणीव झालेल्या पाकिस्तान आता पूर्णपणे गर्भगळीत झालेला आहे. एका बाजूला भारत आणि दुसऱ्या बाजूला अंर्तकलहाने या देशाची भंबेरी उडालेली आहे. पाकिस्तान तहरीक ए इन्साफ पार्टीचा नेता, देशाचा माजी पंतप्रधान इम्रान खान सध्या तुरुंगात आहे. त्याची बहीण अलीमा खान त्याला तुरुंगात भेटायला गेली होती. तिच्यासोबत इम्रानच्या अन्य दोन बहिणी होत्या. तिघांचा राजकारणाशी काडीचाही संबंध नाही. या तिघींना पोलिसांनी रोखले, त्यांची यावेळी बेअदबी
करण्यात आली. पाकिस्तानातील इम्रान समर्थक यामुळे चांगेलच भडकलेले आहे.
हे चित्र बदलल्याशिवाय सरकारशी सहकार्य नाही, अशी भूमिका पक्षाच्या अनेक नेत्यांनी घेतली आहे. बलोचिस्तान, सिंध, खैबर पख्तुनख्वामध्ये सरकार विरोधी आंदोलनाला ऊत आला आहे. पाकव्याप्त काश्मिरात हेच चित्र आहे. पाकिस्तानमध्ये जी काही घबराट आहे, त्याचे कारण फक्त मोदी नाहीत, पाकिस्तानची विटलेली जनता लष्करशहांपासून मुक्ततेसाठी त्यांचे पेकाट मोडले जाण्याची वाट पाहते आहे, हेही महत्वाचे कारण आहे. याच्या विपरीत भारताची जनता ठामपणे मोदींच्या सोबत आहे. मोदी आश्वस्थ आहेत, त्याचे कारण जनता आहे आणि पाकिस्तान भेदरलाय त्याचे कारणही जनता आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)