उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे आयोजित महाकुंभ मेळ्यात सहभागी होण्यासाठी देश- विदेशातून करोडोंच्या संख्येने लोक दाखल होत आहेत. गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमात पवित्र स्नान करण्यासाठी भाविक गर्दी करत आहेत. अशातच महाकुंभाला सुरुवात झाल्यापासून ते मंगळवार, ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत ४५ कोटी लोकांनी पवित्र स्नान केले आहे. जगात एकाच ठिकाणी इतके भाविक एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ आहे.
मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ४९.६८ लाख लोकांनी त्रिवेणीत स्नान केले होते. महाकुंभ मेळाव्याचे आयोजन करताना योगी सरकारने अंदाज लावला होता की, संपूर्ण महाकुंभात एकूण ४५ कोटींहून अधिक लोक उपस्थित राहतील. मात्र, महाकुंभाचा समारोप होण्याआधीचं भाविकांनी ही विक्रमी संख्या गाठली आहे. यामुळे आता महाकुंभात पोहोचणाऱ्या भाविकांची प्रचंड गर्दी पाहता यावेळी महाकुंभसाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येचा नवा विक्रम होईल. अजूनही दररोज लाखो भाविक प्रयागराजला पोहोचत आहेत.
मुख्यमंत्री योगी यांनी सुरुवातीला ४५ कोटी भाविकांच्या आगमनाची शक्यता व्यक्त केली होती. मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत महाकुंभात स्नान करणाऱ्यांची संख्या ४५ कोटींपेक्षा जास्त झाली. मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत सुमारे ५० लाख भाविकांनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले. महाकुंभात अजून १५ दिवस आणि दोन महत्त्वाचे स्नान बाकी आहेत. महाकुंभात येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता, स्नान करणाऱ्यांची संख्या ५०- ५५ कोटींपेक्षा जास्त होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
प्रयागराजमधील तीन अमृत स्नानानंतरही (मकर संक्रांती, मौनी अमावस्या आणि वसंत पंचमी) भाविकांच्या उत्साहात कोणतीही घट झालेली नाही. देशभरातून आणि जगाच्या विविध भागातून, दररोज लाखो-कोटी भाविक प्रयागराजला पुण्य प्राप्त करण्यासाठी पोहोचत आहेत. वसंत पंचमीच्या शेवटच्या अमृत स्नानानंतरही, भक्तीचा प्रचंड उत्साह लोकांना संगम तीरावर आकर्षित करत आहे. स्नान करणाऱ्यांमध्ये १० लाख कल्पवासी तसेच देश-विदेशातील भक्त आणि संतांचा समावेश होता.
हे ही वाचा..
निलेश राणेंनी इशारा देताच, पोलिसांनी मुस्लिमाची अनधिकृत चहाची टपरी हटवली!
राजस्थानच्या अजमेरमधून ८ बांगलादेशींना अटक!
मुंबई हल्ल्यासारख्या पाकिस्तानने दिलेल्या जखमा विसरता येणार नाहीत
इंडी आघाडीला ठेंगा; २०२६ च्या निवडणुकीसाठी ममतांचा एकला चलोचा नारा
महाकुंभात मौनी अमावस्येच्या दिवशी सर्वाधिक ८ कोटी भाविकांनी पवित्र स्नान केले, तर मकर संक्रांतीच्या दिवशी ३.५ कोटी भाविकांनी अमृत स्नान केले. १ फेब्रुवारी आणि ३० जानेवारी रोजी २ कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र स्नान केले आणि पौष पौर्णिमेला १.७ कोटी भाविकांनी पवित्र स्नान केले. वसंत पंचमीला २.५७ कोटी भाविकांनी संगमात पवित्र स्नान केले.