लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाला रोखण्यासाठी म्हणून विरोधकांनी तयार केलेली ‘इंडी’ आघाडी सध्या विखुरली गेल्याचे चित्र आहे. लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या काही राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये ‘इंडी’ आघाडीमधील घटक पक्ष स्वतंत्र निवडणूक रिंगणात उतरले. यानंतर हरियाणा, दिल्ली सारख्या राज्यांमध्ये या सर्वच पक्षांना पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर आता २०२६ मध्ये पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी निवडणुकीसाठी आपली भूमिका स्पष्ट करत ‘इंडी’ आघाडीला झटका दिला आहे.
पश्चिम बंगालच्या २०२६ च्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस किंवा इतर कोणत्याही पक्षाशी युती करण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. त्यांनी एकला चलोचा नारा देत स्पष्ट केले आहे की, तृणमूल काँग्रेस २०२६ च्या बंगाल विधानसभा निवडणुका एकट्याने लढवेल. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी झालेल्या बैठकीत तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आपल्या पक्षाच्या खासदारांना संबोधित करताना पुढील वर्षी होणाऱ्या राज्य विधानसभा निवडणुका दोन तृतीयांश बहुमताने जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला.
ममता बॅनर्जी यांनी म्हटले की, दिल्लीत काँग्रेसने आपला मदत केली नाही. हरियाणामध्ये आपने काँग्रेसला मदत केली नाही. म्हणूनच दोन्ही राज्यांमध्ये भाजपचा विजय झाला. सर्वांनी एकत्र असले पाहिजे, पण बंगालमध्ये काँग्रेसकडे काहीही नाही. त्यामुळे राज्यात काँग्रेससोबत युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी एकटीच लढेन. एकटेच पुरेसे आहोत. एकूण जागांपैकी दोन तृतीयांश पेक्षा जास्त जागा जिंकून पक्ष सलग चौथ्यांदा राज्यात सरकार स्थापन करेल, असा दावा त्यांनी केला.
हे ही वाचा :
‘राहुल गांधी माफी मागा अन्यथा हिंदू धर्मातून बहिष्कृत करू’
वादानंतर ममता कुलकर्णी यांचा किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदाचा राजीनामा
लग्नाच्या संगीत कार्यक्रमात २३ वर्षीय तरुणी नाचता नाचता कोसळली आणि…
भाजपा मतदार यादीत परदेशी लोकांची नावे समाविष्ट करण्याचा प्रयत्न करू शकते, असे सांगून ममता बॅनर्जी यांनी पक्षाच्या आमदारांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. तसेच पक्षाच्या संघटनात्मक रचनेत राज्य पातळीपासून ते बूथ पातळीपर्यंत फेरबदल केले जातील, अशी माहितीही ममता यांनी बैठकीत दिली. २५ फेब्रुवारीपर्यंत ज्येष्ठ नेते अरुप बिस्वास यांना प्रत्येक पदासाठी तीन नावे सुचविण्यास त्यांनी सांगितले. रेशन घोटाळ्याप्रकरणी माजी अन्नमंत्री ज्योतिप्रियो मल्लिक यांच्या अटकेवरही बॅनर्जी यांनी भाष्य केले. त्यांनी ही अटक म्हणजे अन्याय्य असल्याचे म्हटले आणि त्यांच्याविरुद्ध कोणतेही पुरावे नसल्याचे सांगितले.